शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 27, 2014 00:32 IST2014-05-27T00:27:02+5:302014-05-27T00:32:02+5:30
राहुरी (जि. अहमदनगर) : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य दोघांना मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले.

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
राहुरी (जि. अहमदनगर) : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. तर अन्य दोघांना मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तांभेरे येथे ही घटना घडली. सोमनाथ गोरक्षनाथ लाटे ( १५) व राजेंद्र दशरथ लाटे (१६, रा, चिंचोली, ता़ राहुरी) अशी मृतांची नावे आहेत. चिंचोली येथून सहाजण ऊसतोडणीसाठी तांभेरे येथे आले होते़ दिवसभर उन्हात ऊसतोडणी करून थकल्याने व उन्हाची काहिली शमविण्यासाठी ते सर्वजण जवळच असलेल्या सखाहरी दगडू गागरे यांच्या शेततळयात पोहण्यासाठी गेले होते़ त्यातील चौघांना पोहता येत नव्हते. तब्बल २० फूट खोल असलेल्या पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने सोमनाथ व राजेंद्र दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. दरम्यान, संभाजी लाटे व निलेश काळे हे दोघेही पाण्यात उतरून कडेला आंघोळ करीत होते. सोमनाथ व राजेंद्र गटांगळ्या खाऊ लागल्याने संभाजी व निलेश गडबडून गेले व त्यांचा तोल जाऊन तेही खोल पाण्यात पडले. शेततळ्यातील प्लॅस्टिक कागद, गाळ व शेवाळ तयार झाल्याने त्यांना कशाचा आधार मिळत नव्हता. शिवाय पाय घसरत असल्याने वर येण्यास अडथळे येत होते. आता चौघांना वाचविण्याचे मोठे आव्हान त्यांचेच दोन साथीदार अमोल व विशाल आरगडे यांच्यासमोर होते. एकाच वेळी चौघे बुडाल्याने तेही भयभीत झाले. त्यांनी प्रयत्न करून दोघांना वाचवले. मृतांवर रात्री आठ वाजता चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हे.कॉ. आहेर करीत आहेत़ (तालुका प्रतिनिधी) थोड्याच वेळात घटनेची माहिती परिसरात पसरली. तसे लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. राहुरी पंचायत समितीचे उपसभापती दिगंबर शिरसाट, लक्ष्मण साबळे, संभाजी आडसुरे, अण्णासाहेब पारखे, राजेंद्र लाटे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले़ चौघेही बुडत असताना अमोल व विशाल यांनी मोठ्या हिमतीने जवळच असलेली ठिबक सिंचनाची नळी बुडत असलेल्या युवकांकडे फेकली. त्याचा आधार घेत लाटे व काळे पाण्याबाहेर आले. परंतु तोपर्यंत सोमनाथ व राजेंद्र यांचा बुडून मृत्यू झाला होता.