पाऊस आल्याने टँकरच्या संख्येत घट

By Admin | Updated: July 25, 2014 00:25 IST2014-07-25T00:12:23+5:302014-07-25T00:25:53+5:30

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़

Due to the drop in rainfall, the number of tankers decreased | पाऊस आल्याने टँकरच्या संख्येत घट

पाऊस आल्याने टँकरच्या संख्येत घट

अहमदनगर: जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, पाऊस झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली आहे़ पावसाचा जोर कायम राहिल्यास ही संख्या आणखी कमी होईल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी व्यक्त केली़
मागीलवर्षी जिल्ह्यात ११९ टक्के पाऊस पडला होता़ मात्र चालूवर्षी जून अखेर पाऊस पडला नाही़ त्यामुळे जिल्ह्यात ३६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे़ दोन्ही धरणांत सरासरी २८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, अकोले व श्रीरामपूर शहरासाठी सुरू असलेले सात टँकर बंद झाले आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या ३६९ वरून ३६२ वर खाली आली आहे़ पाऊस पडल्याने या परिसरात टँकरची आवश्यकता राहिलेली नाही़ पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे़ सार्वत्रिक पावसाची आवश्यकता असून, पेरणीच्या कामाला वेग आला असल्याचे कवडे यांनी सांगितले़
पाऊस न पडल्यास पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा सप्टेंबरपर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ दक्षिणेतील श्रीगोंदा,पारनेर आणि कर्जतसाठी कुकडी धरणातून पाण्याची मागणी करण्यात आली आहे़तर कोपरगाव व शिर्डीसाठी दारणा धरणातून ७० दलघफू पाण्याची मागणी आहे़
दारणात नवीन पाण्याची आवक झाल्याने तेथून पाणी उपलब्ध होईल़ तसेच ज्या भागात पाऊस झाला नाही, त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले़ (प्रतिनिधी)
विद्यापीठात ४०० एकरवर पेरणी सुरू
जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध आहे़ मात्र पाऊस न पडल्यास खबरदारीचा उपाय म्हणून राहुरी कृषी विद्यापीठात ४०० एकरवर कडवळाची पेरणी करण्याचे काम सुरू झाले़ मुळा धरणातून त्यासाठी पाणी दिले जाणार आहे़ याबाबत शासनाकडे ४२ लाखांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़
शेतसारा भरल्यास जमीन हस्तांतरण शक्य
कूळ कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जमिनी मिळालेल्या आहेत़ मात्र त्यांना या जमिनीचे हस्तांतराचा हक्क प्राप्त झालेला नाही़ शासनाने याविषयी नवीन अध्यादेश नुकताच जारी केला आहे़ त्यानुसार १ जुलै २००४ पर्यंत ज्या शेतकऱ्यांना ३२ एम प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी शेतसाऱ्याच्या ४० पट रक्कम भरून हा हक्क प्राप्त करून घ्यावा़ येत्या ३१ जुलैपर्यंत ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे यावेळी कवडे यांनी सांगितले़

Web Title: Due to the drop in rainfall, the number of tankers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.