अवर्षण भागातील शेतीही फुलणार
By Admin | Updated: June 23, 2014 00:07 IST2014-06-22T23:25:02+5:302014-06-23T00:07:35+5:30
थोरात : निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सुरू
अवर्षण भागातील शेतीही फुलणार
अकोले : निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्णत्वाकडे जात असून कालवेही लवकरच पूर्ण होत अवर्षण भागातील शेतकऱ्यांची शेती फुलणार आहे. धरणासाठी पिचडांच्या खाद्याला खांदा लावून पुनर्वसनापासून ते निधी मिळवण्यासाठी सरकार दरबारी लढलो म्हणूनच निळवंडे निर्मितीचा आनंद घेता आला, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
निळवंडे धरणाच्या उंचावरील कालवा विमोचक बोगद्याच्या खोदाईचा शुभारंभ मंत्री थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाला. यावेळी थोरात यांनी निळवंडेच्या कामात आलेल्या अडचणी संगमनेर, अकोल्याच्या मंत्रीद्वयींनी कशा दूर केल्या ते सांगितले.
पालकमंत्री पिचड म्हणाले, उद्या थोरातांच्या रुपाने जिल्ह्यात मुख्यमंत्रीपद येणार असून त्यांना आपले व्यक्तिगत व पक्षाचे पाठबळ देऊन सहकार्य करू. निळवंडे निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असून स्वर्गीय भाऊसाहेबांचे सतत मार्गदर्शन लाभले म्हणून चार कालवे असलेला हा पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. पाण्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना उंचावरील कालव्यांमुळे हक्काचे पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाची तहान भागणार आहे. प्रवरा नदीपात्र वाळू उपशामुळे खोल गेले आहे. नदीची झिज भरुन येण्यासाठी ‘प्रोफाईल वॉल’ गरजेची असून पूर्वेकडून कितीही विरोध झाला तरी अकोले, संगमनेर तालुक्यात ‘प्रोफाईल वॉल’करणारच असे ना. पिचड यांनी स्पष्ट केले.
निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंत आभाळे यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी शेतमजूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर नवले, जि. प. सदस्य परबत नाईकवाडी, मिनानाथ पांडे यांचीही भाषणे झाली. काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)