बारा ग्रंथांतून घडणार डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन
By Admin | Updated: April 19, 2016 00:13 IST2016-04-19T00:05:53+5:302016-04-19T00:13:12+5:30
अहमदनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

बारा ग्रंथांतून घडणार डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन
अहमदनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली जात आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांचे विचारदर्शन समाजाला घडविण्याचा प्रयत्न असल्याचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देश-विदेशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्त पारंपरिक कार्यक्रमांना छेद देवून नॉलेज मिशनचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आजवर ज्ञात नसलेले डॉ.आंबेडकर समाजासमोर पुस्तकरूपाने मांडण्याचा प्रयत्न आहे. आंबेडकरांचे काही ठराविक पैलूच समाजाला माहीत आहेत. डॉ. आंबेडकर यांचे प्रशासन, शेती, पाणी, संरक्षण, अर्थशास्त्र याबाबत काय विचार होते यावर प्रकाश टाकण्यासाठी या प्रत्येक विषयावरील स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती तज्ज्ञांमार्फत केली जात आहे. पहिल्या टप्प्यात बारा ग्रंथांची निर्मिती सुरु आहे. हे ग्रंथ मे महिन्यात जनतेसाठी खुले केले जाणार आहेत. त्यांचा इतर भाषांत अनुवादही केला जाणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या ज्ञानपैलुंमधील प्रत्येक विषयावर वर्षभरात ३५ जिल्ह्यातील ३५६ तालुक्यांमध्ये व्याख्याने दिली जाणार आहेत. या उपक्रमामध्ये राज्यातील २० ते ८० वर्षे वयोगटातील नामवंत वक्ते सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
बारा ग्रंथ आणि त्याचे लेखक
शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. यू. म. पठाण, औरंगाबाद), राष्ट्रभक्त डॉ. आंबेडकर (डॉ. भूषणकुमार जोरगुलवार, लातूर), राज्यशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे, निलंगा-लातूर), संरक्षण विषयक तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. विजय खरे, पुणे), प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संभाजी खराट, मुंबई), महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बी. व्ही. जोंधळे, औरंगाबाद), नवसंस्कृतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. यशवंत मनोहर, नागपूर), अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. इंद्रजित आल्टे, औरंगाबाद), समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. प्रदीप आगलावे, नागपूर), कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. सुभाष खंदारे, वर्धा), जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. डी. टी. गायकवाड, पुणे), विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. विजयकुमार पोटे, अहमदनगर)
ग्रंथसंचासोबत डीव्हीडी भेट
बारा ग्रंथांच्या संचासोबत डॉ. आंबेडकर यांच्या निवडक ग्रंथांची डीव्हीडी व निवडक छायाचित्रांची डीव्हीडी भेट देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत मे-२०१६ अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ग्रंथाची नोंदणी प्रत्येक जिल्ह्यातील डॉ. आंबेडकर दुतांकडे करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ‘आंबेडकर नॉलेज मिशन डॉट कॉम’या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनी उर्वरित १३ ज्ञानपैलुंवरील १३ ग्रंथ प्रकाशित करण्याची योजना आहे. यामध्ये बाबासाहेबांची पत्रकारिता, वकिली आदी विषयांचा समावेश आहे. सर्व ग्रंथांचा विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असून त्यासाठी लेखकांची टीम तयार झाली आहे, असे गव्हाणे म्हणाले.
‘नॉलेज पार्टनर’ची मदत
ग्रंथ संच प्रकाशनासाठी कोणताही प्रायोजक घेतलेला नाही. राजकीय पुढाऱ्यांकडून किंवा सरकारकडून मदत घेतलेली नाही. डॉ. आंबेडकर यांच्याविषयी आस्था असलेल्या कार्यकर्त्यांनी ग्रंथ प्रकाशनासाठी निधी उभा केला आहे. त्यांना ‘नॉलेज पार्टनर’ असे संबोधण्यात आले आहे. कोणताही नफा कमविण्याच्या उद्देशाने नव्हे तर डॉ. आंबेडकर यांचे विचार समाजात रुजावेत, असा उदात्त हेतू ग्रंथ प्रकाशनामागे आहे. त्यामुळे ग्रंथविक्रीतून पैसै मिळाल्यानंतर ते नॉलेज पार्टनरला परत केले जाणार आहेत. ग्रंथ संच कोणत्याही बुकस्टॉलवरून नव्हे तर डॉ. आंबेडकर दुताच्या मार्फत विक्री केला जाणार आहे. कार्यकर्त्याला चार पैसै उत्पन्न मिळावे, हाच हेतू त्यामागे आहे.