अहमदनगर : जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. ही पिके वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
गुरुवारी दुपारी मुरकुटे यांनी याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांना दिले. यावेळी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटणे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, अशा इशारा पत्रकात देण्यात आला आहे.
निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुळा धरणातून वेळेवर शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडले होते. तरीसुद्धा शंकरराव गडाख यांनी त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. आता तर ते राज्याच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता. त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईत बसून नव्हे तर शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतरच कळतात. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडावे.
--------
०८ बाळासाहेब मुरकुटे
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याची मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील यांना दिले. समवेत यावेळी रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटणे.