गट सचिवांच्या असहकाराने ८४ सेवा संस्थांचा कारभार ठप्प
By Admin | Updated: July 2, 2017 17:33 IST2017-07-02T17:33:10+5:302017-07-02T17:33:10+5:30
पाथर्डी तालुक्यातील सुमारे ४५ गटसचिवांचा असहकार सध्या सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ८४ सेवा संस्थांचा कारभार सध्या ठप्प झाला आहे.

गट सचिवांच्या असहकाराने ८४ सेवा संस्थांचा कारभार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
तिसगाव : पाच दिवसांपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी संपामुळे पाथर्डी तालुक्यातील सुमारे ४५ गटसचिवांचा असहकार सध्या सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील ८४ सेवा संस्थांचा कारभार सध्या ठप्प झाला आहे.
शासन कर्जमाफीसंदर्भात सेवा संस्था स्थरावर माहिती मागविली आहे. जूनअखेर आर्थिक वर्ष असल्याने वसुली, नवे कर्ज असे महत्त्वाचे कार्यालयीन कामकाज या असहकार आंदोलनाने थंडावले आहेत. याबाबत गटसचिवांचे राज्यस्तरीय संघटनांच्या वतीने बारा जूनला लेखी निवेदन सहकार आयुक्तांना दिले होते. २७ जून अखेरचा अल्टिमेटम देत प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, असे माहिती घेता समजले. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना फलश्रुती या गटसचिवांच्या असहकाराच्या भूमिकेने अधिकच लांबणीवर जात आहे.
पाथर्डी तालुका दुष्काळी असूनही जिल्हा बँक स्थरावर वसुलीबाबत जिल्ह्यात अग्रणी आहे. त्यामुळे ब-याच संस्थेत थकबाकीदार संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. सरसकट दीड लाख कर्जमाफी धोरण तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारे ठरत आहे. कर्जमाफीच्या वादळी चर्चेत गटसचिव असहकार आंदोलनाने आणखी विरजण घातले असल्याची भावना गाव पारावरच्या चर्चेचा भाग बनली आहे.
अशा आहेत अडचणी
शुन्य टक्के व्याजदराचे धोरण अवलंबविताना संस्थेचे नफ्याचे प्रमाण कमी आहे. नियमित कर्ज भरणारांचे येणे व्याज शासन स्थरावरून येण्यास विलंब लागतो. व्यवस्थापन खर्चाला त्यामुळे अडचणी येतात. कर्जवाटपाचे पोटी एक टक्का संस्था व्यवस्थापन खर्चासाठी अनुदान देणार होते. ते मिळाले नाही. आधीच सचिवांचे पगार तुटपुंजे आहेत व त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक संस्थांचा पदभार आहे.