दिलीप गांधी यांची मंत्रिमंडळात वर्णी
By Admin | Updated: May 26, 2014 00:27 IST2014-05-26T00:19:31+5:302014-05-26T00:27:10+5:30
अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तिसर्यांदा खासदार म्हणून निवडून गेलेले दिलीप गांधी यांचा सोमवारी होणार्या मंत्रिमंडळाबरोबर शपथविधी होणार आहे.
दिलीप गांधी यांची मंत्रिमंडळात वर्णी
अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तिसर्यांदा खासदार म्हणून निवडून गेलेले दिलीप गांधी यांचा सोमवारी होणार्या मंत्रिमंडळाबरोबर शपथविधी होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्यानंतर दुसर्यांदा मंत्री होणारे गांधी हे जिल्ह्यातील पहिलेच केंद्रीय मंत्री ठरणार आहेत. त्यांच्या मंत्रीमंडळात होणार्या समावेशामुळे भाजपातही चैतन्य संचारले आहे. खासदार दिलीप गांधी यांचा विजय झाल्याक्षणीच त्यांना दिल्लीचे निमंत्रण मिळाले होते. निकालाच्या दुसर्या दिवशीपासून गांधी हे दिल्ली येथे तळ ठोकून आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पहिल्याच यादीत गांधी यांच्या मंत्रीपदावर नवी दिल्ली येथे रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. ही बातमी धडकताच भाजपामध्ये चैतन्य संचारले. गांधी यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत नगरसेवक सुवेंद्र गांधी म्हणाले, विमानतळ, रेल्वेचे दुहेरीकरण, किल्ल्याचे सुशोभिकरण,औद्योगिक विकास, पायाभूत संरचनांबाबतचे प्रश्न सक्षमपणे सोडविणे आता शक्य होणार आहे. मोदींच्या कणखर नेतृत्त्वामुळे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी गांधी स्वत:च थेट नरेंद्र मोदी यांच्या संपर्क व सहवासात होते. गांधी यांचे मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध, गांधी यांचे गुजरातप्रेम,महाराष्ट्रातून एकमेव जैन खासदार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व अशी जमेची बाजू गांधी यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांचा मंत्रीमंडळात समावेश पक्का झाला. हजारे आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात. अशावेळी हजारे यांच्या सर्वात जवळचे परिचित म्हणून गांधी यांच्याकडे पाहिले जाते. शिर्डी, शनिशिंगणापूर या देशभरात प्रसिद्ध असलेल्या स्थळांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणूनही गांधी यांनी ठसा उमटविला आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर होणार्या मंत्र्यांमध्ये गांधी यांचा समावेश झाल्याने जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा होत आहे.