कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढणार
By Admin | Updated: December 16, 2015 23:06 IST2015-12-16T22:31:00+5:302015-12-16T23:06:45+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली.

कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढणार
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. यावर महाजन यांनी आवर्तन तीन दिवसांनी वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
आ. जगताप यांनी बुधवारी नागपूर येथे जलसंपदा मंत्री महाजन यांना कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी वाढविण्याबाबत पत्र दिले. आ. जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे, कुकडीचे पाण्यासाठी आवर्तन सोडल्यास २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी दोन ते अडीच टीएमसी पाणी लागते. हे आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा १५ हजार ७३७ हेक्टर, कर्जत १५ हजार ७१५ हेक्टर, करमाळा १२ हजार ६२५ हेक्टर, पारनेर ७ हजार ५७७ हेक्टर क्षेत्र गृहीत धरून नियोजन केले आहे. कुकडी लाभक्षेत्रात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी जमिनीत जादा प्रमाणावर मुरणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवर्तन कालावधी वाढविणे आवश्यक आहे. आ. जगतापांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा मंत्री महाजन यांनी तीन दिवसांनी आवर्तन वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
श्रीगोंदा तालुक्यात वेळेवर आवर्तन सुरू करण्यात आले. किमी १३२ विसापूर कालवा सुरू असून डी वाय १३ व १४ दि. १७ पासून सुरू होणार आहेत, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी दिली.