हिरण हत्याकांडामुळे पोलिसांवर टीकेची झोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:47+5:302021-03-13T04:36:47+5:30
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र ...

हिरण हत्याकांडामुळे पोलिसांवर टीकेची झोड
श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्यांकाडाच्या तपासात काही अंशी प्रगती झाली असली तरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मात्र टीकेची झोड उठली आहे. विशेषत: बेलापूर ग्रामस्थांनी पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवर जाहीरपणे गंभीर आरोप केले. अधिवेशनातही विरोधी पक्षांनी त्यावरून रान उठविले. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. स्वत: जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील येथे हिरण यांचा मृतदेह आढळल्यापासून ठाण मांडून आहेत. पोलीस महानिरीक्षकांनीही येथे भेट देऊन पाहणी केली. मात्र, तरीही पोलिसांवरील व्यापारी समाजाचा रोष कमी झालेला नाही.
सोमवारी हिरण यांचे बेलापुरातून सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान अपहरण झाले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उशिरा याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांना निवेदन द्यावे लागले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. त्यानंतरच तपासाला काही प्रमाणात गती मिळाली.
सोमवारी रात्री हिरण बेपत्ता होताच पोलिसांनी तालुक्याच्या सीमेवर नाकाबंदी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तत्काळ शहरातील काही अट्टल गुन्हेगारांवर तपासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. त्यातून पोलिसांना धागेदोरे मिळू शकले असते. मात्र त्या पातळीवर कारवाया झाल्या नाहीत.
विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहखात्याचे हे अपयश असल्याची टीका केली. मात्र, जिल्हा पोलीस प्रमुखांना आरोप मान्य नाहीत. तपासात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आले तर कार्यवाही केली जाईल, असे पाटील यांचे म्हणणे आहे.
----------