अखंड वाचन... खडतर परिश्रम!

By Admin | Updated: June 13, 2014 01:15 IST2014-06-13T00:50:28+5:302014-06-13T01:15:16+5:30

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता.

Continuous reading ... tough hard work! | अखंड वाचन... खडतर परिश्रम!

अखंड वाचन... खडतर परिश्रम!

अहमदनगर : आठवी-नववीपासूनच अवांतर आणि पुस्तकांच्या वाचनामध्ये गढून जात होतो. तेव्हापासूनच लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन देशसेवेची संधी घ्यायची, असा निर्धार केला होता. खडतर परिश्रम आणि जॉब करताना वेळ काढत केलेल्या अभ्यासामुळेच हे यश मिळाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १५३ वा आलेल्या नगरच्या ऋषिकेश हेमंतप्रसाद पत्की याने ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना आपले यशाचे रहस्य उलगडले.
ऋषिकेश याने माध्यमिक शिक्षण फिरोदिया हायस्कूलमध्ये पूर्ण केले. पेमराज सारडा महाविद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. पुणे येथील पीव्हीजी अभियांत्रिकी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली. तो सध्या एम.ई. प्रथम वर्षात शिकत आहे. तसेच त्याला इन्फोसीसमध्येही नोकरीची संधी मिळाली होती. मात्र त्याने ती धुडकावली आणि पुण्याच्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. नोकरी, एम.ई.चा अभ्यास आणि त्याचवेळी युपीएससीचा अभ्यास अशा तीन पातळ््यांवर तो दिवसरात्र परिश्रम करीत होता. त्याचे वडील हेमंतप्रसाद पत्की हे क्रॉम्प्टन कंपनीमधून निवृत्त झाले आहेत, तर आई वैजयंती पत्की या बँक आॅफ इंडियाच्या तेलीखुंट येथील शाखेत कार्यरत आहेत.
ऋषिकेश म्हणाला, माझं यश हे शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक होतं. निकाल जाहीर झाल्यानंतर खूप छान वाटलं. अर्थात त्यासाठी खडतर परिश्रम करावे लागले. खूप कष्ट आणि संयम फार महत्त्वाचा होता. खूप तयारी केली होती. जॉब करीत करीत अभ्यास केला. जेवढा जास्त वेळ मिळायचा, तेवढा जास्त वेळ अभ्यासासाठी काढला. लहानपणापासूनच अभ्यासाची, वाचनाची आवड होती. आठवीत असल्यापासून वर्तमानपत्र वाचनाची आवड होती. यातूनच समाजाकडे बघण्याची दृष्टी मिळाली. त्याचवेळी देशसेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. नेहमीपेक्षा वेगळे करण्याची उर्मी होती. युपीएससी परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्याचा फायदा स्वत:ला आणि देशाला होतो. गेल्या दोन वर्षांपासून युपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. शालेय जीवनापासून केलेले भरपूर वाचन मला कामी आले. पुण्यातील मराठी विषयाचे प्रवीण चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचे आहे. त्यामध्येच मी जास्त खूश राहील. आयोगाच्या परीक्षा दिल्यामुळे व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होते. हे घडणं स्वत:च्या आणि देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरते, असाच या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे.
(प्रतिनिधी)
‘लोकमत’शी स्नेह
ऋषिकेशचा लोकमतशी पूर्वीपासूनच स्नेह आहे. शालेय जीवनापासूनच ‘लोकमत’ वाचायचो. २००६-०७ मध्ये लोकमतधून ऋषिकेशी या नावाने त्याने वात्रटिका लिहिल्या आहेत. त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप आवडायच्या. लोकमतमध्ये त्याचे नेहमीच येणे-जाणे असायचे.

Web Title: Continuous reading ... tough hard work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.