युती सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यातच व्यस्त
By Admin | Updated: June 19, 2016 23:11 IST2016-06-19T23:02:34+5:302016-06-19T23:11:26+5:30
अकोले : दुष्काळामुळे मराठवाड्यातील लोकांचे होणारे स्थलांतर लक्षात घेऊन तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय घेतला

युती सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यातच व्यस्त
अकोले : दुष्काळामुळे मराठवाड्यातील लोकांचे होणारे स्थलांतर लक्षात घेऊन तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय घेतला ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करत जलप्रकल्प तयार होताना काम लांबले तर किंमत वाढते तशी निळवंडेची किंमत वाढली. मात्र भाजपा सरकार सिंचनाचा मुद्दा घेऊन मुद्दाम आमची बदनामी करत असून शेतकरी विरोधी युती सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील इंदोरी येथे ‘कथा निळवंडे धरणाची’या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विठ्ठल आभाळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकर पिचड होते. भाजपा सरकारच्या पायगुणामुळे पाऊस पडेनासा झाला, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
पुस्तक प्रकाशन सोहळा ही आगामी निवडणुकांच्या प्रचाराची नांदी ठरली. बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बचतगट चळवळीच्या उत्थानाविषयी सभागृहातून चकार शब्द न आल्याने बचतगटाच्या महिला नाराजी घेऊन सभागृहाबाहेर पडल्या. माजी मंत्री पिचड, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार वैभव पिचड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, विठ्ठल आभाळे यांची मनोगते झाली. जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, गिरजाजी जाधव, सभापती अंजना बोंबले उपस्थित होते.
अच्छे दिनचे
स्वप्न फोल
पवार म्हणाले, भाजपाने दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न फोल ठरले. युती सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. कर्ज माफीविषयी सरकार बोलायला तयार नाही. दुधाचे भाव गडगडले, बियाणाच्या किंमती वाढविल्या. डाळीचे भाव वाढले आदी बाबींचा ऊहापोह करत येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चांगली तयारी करा, असा सल्ला त्यांनी दिला.