मुख्याधिकाऱ्यांना कोंडले
By Admin | Updated: March 24, 2016 00:13 IST2016-03-24T00:11:44+5:302016-03-24T00:13:12+5:30
संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी होळी सण साजरा न करता बुधवारी सायंकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांना त्यांच्या

मुख्याधिकाऱ्यांना कोंडले
संगमनेर : शहरातील अतिक्रमणे हटविल्याने विस्थापित झालेल्या टपरीधारकांनी होळी सण साजरा न करता बुधवारी सायंकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांना त्यांच्या दालनात कोंडून घेतल्याने पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
शहरातील ‘सिग्नल’ चालू करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गासह नवीन नगररोडवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाईचा फटका नवीन नगररोडवरील छोट्या व्यवसायिकांना बसला. नगरपरिषदेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी टपरीधारकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी पालिका पदाधिकाऱ्यांना घेराओ घातला गेला. मात्र पालिका सभेत कुठलाही निर्णय न झाल्याने संतप्त टपरीधारकांनी बुधवारी सायंकाळी चार वाजता पालिकेवर मोर्चा नेला. टपरीधारकांनी मुख्याधिकारी कुरे यांना त्यांच्या दालनातच कोंडून घेतले. या प्रकाराने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले. गरज नसलेले ‘सिग्नल’ तातडीने बंद करावेत, टपरी धारकांना जागा द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. उपनगराध्यक्ष गजेंद्र अभंग, कुरे, इनामदार यांनी टपरी धारकांशी चर्चा केली. दिड तास ठाण मांडून बसलेल्या टपरी धारकांना शेवटी अभंग यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत सदर विषयावर मंगळवारी विशेष सभा घेण्याचे जाहीर केले. त्यास आंदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. याप्रसंगी नगरसेवक किशोर पवार, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, टपरी धारक संघटनेचे सचिन साळुंके, दीपक साळुंके, कासीम शेख, विशाल पोकळे, अजहर शेख, पप्पू तांबोळी, कैलास फटांगरे, प्रमोद गणोरे, शंकर भारती, फईम बागवान, नाजीम बागवान, कैलास दसरे, विजय दसरे, बाबूराव गवांदे, अनिल महाराज, सोमनाथ वडेवाले, गौरव मिसाळ, नंदू भोईर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)