अहमदनगर : कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या नियोजनानुसार यावर्षी ६ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी होणार असून, यावर्षी कडधान्य व तेलबियांची पेरणी वाढणार आहे़ तर कडधान्य व तेलबियांच्या उत्पादकतेतही १० टक्के वाढ होणार आहे़ सद्यस्थितीत काही प्रमाणात बियाणे, खते विक्रीसाठी उपबलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले़ खरीप हंगामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ बैठकीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, शेतकरी अपघात विमा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, कृषी विकास योजना, सूक्ष्म सिंचन अभियान, कोरडवाहू शेती अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. खरीप हंगामासाठी ६ लाख १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट आहे. सुमारे २ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये (बाजरी, भात, मका आदी) पिकांची पेरणी होणार आहे़ तर कडधान्य ७० हजार, तेलबिया ७० हजार, कापूस १ लाख ३० हजार, ऊस १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे़ त्यानुसार बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ कपाशीचे महाबीज कंपनीचे ५५५५ पाकिटे व इतर ४ लाख ७८ हजार ८८८ पाकिटे अशी एकूण ४ लाख ८४ हजार ४४३ पाकिटे बियाण्यांची मागणी केली आहे़ यापैकी २८ हजार पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत़ बाजरी (५२५० क्विंटल) भात (२३३०), मका (६७५०), कडधान्य (३८५५), तेलबिया (८१५), सोयाबीन (४१२५०) आदींच्या बियाणांची मागणी करण्यात आली आहे़ या हंगामासाठी २ लक्ष ५५ हजार ४०० मे. टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्यांना बियाणे, खते वेळेवर उपलब्ध व्हावीत, छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये, खते कधी उपलब्ध होतील याची माहिती शेतकर्यांना व्हावी, वितरण करताना कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याची पूर्वकल्पना देण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत़ (प्रतिनिधी) खते, बियाण्यांच्या गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हा स्तरावर ६ गुणनियंत्रण निरीक्षक, उपविभागस्तरावर ८, तालुकस्तरावर २८ असे एकूण ४२ निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे़ जिल्ह्यात परवानाधारक बियाणे वितरक १ हजार ८१६, खते वितरक १ हजार ८७७ तर किटकनाशके वितरक १ हजार ७७१ आहेत.
कडधान्य, तेलबियांची पेरणी वाढणार
By admin | Updated: June 3, 2023 10:43 IST