बँकेला शेतकरी, कारखानदार दोघेही समान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:58+5:302021-03-13T04:36:58+5:30
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष म्हणून बँकेसाठी शेतकरी सभासद व जिल्ह्यातील कारखानदार हे दोन्ही समान असल्याची भूमिका ...

बँकेला शेतकरी, कारखानदार दोघेही समान
अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष म्हणून बँकेसाठी शेतकरी सभासद व जिल्ह्यातील कारखानदार हे दोन्ही समान असल्याची भूमिका अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी मांडली.
जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष उदय शेळके म्हणाले, जिल्हा बँकेकडून वाटप केल्या गेलेल्या कर्जाची नियमित वसुली झाली, तर पुन्हा शेतकरी सभासद आणि कारखानदारांना कर्जपुरवठा करता येणार आहे. कर्जाची परतफेड ही वेळेत केल्यास जसा बँकेचा फायदा आहे, तसा कर्जदाराचाही फायदाच आहे. वेळेत कर्ज परत केल्यास शेतकरी सभासदांना पुन्हा कर्ज मिळणार आहे. मागील आर्थिक वर्षांत घेतलेले कर्ज परत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. या मुदतीत कर्ज वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. कर्ज वसुलीबाबत प्रशासनाला कुठल्याही सूचना केलेल्या नाहीत. मार्च महिन्यात कर्ज वसुलीची कार्यवाही केली जाते, त्यानुसार ही वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि कारखानदारांना वेगळे नियम असे यापुढे होणार नाही. कर्ज वसुलीसाठी जे नियम शेतकऱ्यांसाठी, तेच नियम कारखानदारांसाठी, असे शेळके म्हणाले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची येत्या सोमवारी सभा होत आहे. नवनिर्वाचित संचालकांची ही पहिली सभा आहे. मार्च अखेर असल्याने कर्ज वसुलीबाबतचे महत्त्वाचे विषय सभेसमोर असतील. नूतन अध्यक्ष शेळके यांना महानगर बँकेच्या कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे शेळके यांच्याकडून सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे.