राहुरी : महावितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा केंद्राचा डाव आहे. भविष्यात ही कंपनी अदानी - अंबानी यांच्याकडे गेल्यास शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकरी हितासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात, असे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी सबस्टेशनवर गुरुवारी पंडित दीनदयाळ ग्रामज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिले लिंक फीडर बसविण्यात आले. तसेच ३२ लाख रुपये अंदाजपत्रक असलेला ब्राह्मणी - केंदळ डांबरीकरण रस्ता, चेडगाव ते जुना कात्रड रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बोलत होते.
ऊर्जा विभागात काम करणं हे खरंतर आव्हानात्मक होतं. तरी शेतकऱ्यांची सेवा करता यावी म्हणून हे ऊर्जा खाते हे मी घाबरत- घाबरत घेतले. राज्यात महावितरण कंपनीची ६० हजार कोटी थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. शेतकऱ्यांसाठी नवीन ऊर्जा धोरण आणले आहे. थकीत शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकीत सवलत देऊन दंड माफ केला. या योजनेमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक सवलती देऊन ६५ वीजबिलात माफी दिली. आगामी काळात आपल्या मतदार संघात एकही ट्रान्सफार्मर ओहरलोड राहणार नाही, याची खात्री देत अधिकाधिक कामे करून विकासाचा डोंगर उभा करू, असेही तनपुरे म्हणाले. शेतकऱ्यांनी आपले वीजबिल भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, नामदेव म्हसे, केशव बेरड, विकास तरवडे, सरपंच संजय खरात, डाॅ. राजेंद्र बानकर, नंदकुमार तनपुरे, संतोष धसाळ, धीरज पानसंबळ, बन्सी औटी, बाबासाहेब तोडमल, ईश्वर कुसमुडे, सचिन ठुबे, दादासाहेब हापसे, बाळासाहेब देशमुख, शिवाजी राजदेव, राजेंद्र मोरे, उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड, मंगेश गांगुर्डे, नितीन मुरकुटे, रवींद्र आढाव, संभाजी पालवे, प्रकाश देठे, माऊली पवार, अमोल वाघ, विठ्ठल मोकटे उपस्थित होते.