भंडारदरा ७२ तर मुळा ५० टक्के भरले
By Admin | Updated: September 20, 2015 00:50 IST2015-09-20T00:45:49+5:302015-09-20T00:50:38+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या मान्सूनचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे़

भंडारदरा ७२ तर मुळा ५० टक्के भरले
अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या मान्सूनचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यांत बऱ्यापैकी वाढ झाली आहे़ शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार राहिल्याने भंडारदरा ७२़५४ तर मुळा धरण ५४़६३ टक्के भरले आहे़ जिल्ह्यातील क्षेत्राला लाभ होणाऱ्या इतर धरणांतही नव्याने पाण्याची आवक झाली आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७०. ३९ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कमी -अधिक प्रमाणात सर्वच तालुक्यात पाऊस होत असल्याने दुष्काळाची धग काही प्रमाणात कमी झाली आहे़ काही दिवसांपुरता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे़ शुक्रवारी तर अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर संगमनेर या तालुक्यांत सर्वाधिक पाऊस झाला़ या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन जनावरेही मृत्युमुखी पडली़ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांमध्ये नव्याने पाण्याची आवक वाढली आहे़ पूर्वा नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाला सुरुवात होऊन सलगता राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ गेल्या तीन महिन्यात झाला नाही, एवढा पाऊस गेल्या आठ दिवसांत झाल्याची नोंद आहे़ हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणांच्या पाणीसाठ्यांत आणखी वाढ होणार आहे़
मुळा धरणात २४ तासात ५०० दलघफू पाण्याची आवक झाली़ धरणात १४४५० दलघफू पाणी साठा झाला आहे़
दारणा ६९ टक्के तर गंगापूर धरण ६६ टक्के पाणीसाठा
कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने उघडीप दिली आहे़ त्यामुळे गोदावरीत नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे़ शुक्रवारी रात्री २० हजार क्युसेकपर्यंत असलेला विसर्ग शनिवारी दुपारी बारा वाजता १३ हजार क्युसेक केलेला विसर्ग सायंकाळी १६१४ क्युसेकपर्यंत घटविला़ त्यामुळे दुथडी भरू न वाहणाऱ्या गोदावरीचे पाणी कमी झाले़ कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर भागाला वरदान ठरणाऱ्या दारणा धरणात ६९़२२, तर गंगापूर धरणात ६६ टक्के पाणी साठा झाला आहे़
कोपरगाव, रवंदे परिसरात अतिवृष्टी
कोपरगाव व रवंदे महसुली मंडळात शुक्रवारी अतिवृष्टी झाली़ खडकी व रवंदे येथे चार घरांची पडझड झाली़ शनिवारी पावसाने उघडीप दिली़ कोपरगाव महसुली मंडळात ७० मि़ मी़, पोहेगाव मंडळात ६२, सुरेगाव मंडळात ५०, दहेगाव बोलका मंडळात ६१ व रवंदे महसुली मंडळात ९३ मि़ मी़ पावसाची नोंद झाली़ खडकी परिसरात दोन व रवंदे गावात दोन घरांची पडझड झाली़ या ठिकाणी ७० ते १५ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकते, अशी माहिती तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी दिली़