जबाबदारीचे भान ठेवा, अन्यथा घरी पाठवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:57+5:302021-04-07T04:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महापालिका म्हणजे धर्मशाळा नाही. एकमेकांच्या आड लपून काम करू नका. कर्मचाऱ्यांवर कुणाचा वचक राहिला ...

जबाबदारीचे भान ठेवा, अन्यथा घरी पाठवू
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिका म्हणजे धर्मशाळा नाही. एकमेकांच्या आड लपून काम करू नका. कर्मचाऱ्यांवर कुणाचा वचक राहिला नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत जबाबदारीचे भान ठेवा, अन्यथा घरचा रस्ता दाखवू, अशी तंबी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी पाणी वितरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली.
मंगळवारी पाणीपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागप्रमुख अधिकारी
अभियंता रोहिदास सातपुते, माजी नगरसेवक निखिल वारे, अभियंता गणेश गाडळकर, अधिकारी, कर्मचारी व व्हॉलमन उपस्थित होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेची मध्यंतरी घुले यांनी पाहणी केली. या पाहणीत पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. पुरेसे पाणी उपलब्ध होऊनही गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी वितरणाच्या नियोजनासाठी शहराततील व्हॉल्व्हमनची बैठक घेण्यात आली. या बैठकीत घुले यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, महापालिका म्हणजे धर्मशाळा नाही. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करा. पाणी उपसा केंद्रांवरील कर्मचारी व वितरणाचे काम करणारे व्हॉल्व्हमन यांच्या बेजबाबदारपणामुळे नगरकरांना वेळेवर आणि उच्च दाबाने पाणी मिळत नाही. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. नागरिकांच्या प्रश्नांना अधिकाऱ्यांना नाही तर नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना डायऱ्यासोबत ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. किती कर्मचाऱ्यांकडे डायऱ्या आहेत, अशी विचारणा घुले यांनी केली. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांकडे डायऱ्याच नसल्याचे निदर्शनास आले. ज्या कर्मचाऱ्यांकडे डायऱ्या नाहीत, अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. जे कर्मचारी दिलेले काम करत नसतील, अशा कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी पाठवा. पाणीपुरवठा विभागासाठी नव्याने कर्मचारी भरती करण्यास स्थायी समितीच्या सभेत मंजुरी दिली जाईल; परंतु चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, असे ही घुले यांनी बजावले.
...
काय केल्या उपाययोजना?
नागापूर, बोल्हेगाव भागाला फेज २ योजना पूर्ण केली असून त्याद्वारे पाणीपुरवठा होईल.
मुकुंदनगरलाही फेजर२ द्वारे लवकरच पाणीपुरवठा
सारसनगर, विनायकनगर, रेल्वेस्टेशन परिसराला दूषित पाणीपुरवठा बंद केला.
...
०६ अविनाश घुले