अवघा मराठा लोटला
By Admin | Updated: September 24, 2016 00:12 IST2016-09-24T00:03:08+5:302016-09-24T00:12:17+5:30
अशा वीरवाणीने संस्कृती वाघस्कर आणि राधा पवार या शालेय मुलींनी चांदणी चौकात जमलेल्या लाखोंच्या मराठा समुदायामध्ये चैतन्याची फुंकर घातली आणि अवघ्या नगरमध्ये चैतन्य सळसळले.

अवघा मराठा लोटला
अहमदनगर :
‘ऊठ मराठा, जाग मराठा,
एक मराठा, लाख मराठा,
वीर मराठा, शूर मराठा’
अशा वीरवाणीने संस्कृती वाघस्कर आणि राधा पवार या शालेय मुलींनी चांदणी चौकात जमलेल्या लाखोंच्या मराठा समुदायामध्ये चैतन्याची फुंकर घातली आणि अवघ्या नगरमध्ये चैतन्य सळसळले. मराठी लेकींनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून मागण्या प्रभावीपणे मांडल्या. हक्कांसाठी अवघा मराठा नगरमध्ये लोटला आणि ऐतिहासिक नगरमध्ये मराठ्यांची मूकपणे क्रांती घडली. भगव्या पताकांच्या साक्षीने चांदणी चौक या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला.
आकाशात तळपणारा सूर्य ढगांच्या आडून मध्यान्ही आला आणि चांदणी चौकात मराठ्यांचा एल्गार मराठा लेकींच्या वाणीतून सळसळला. चांदणी चौकातील उंच व्यासपीठावर दुपारी बाराच्या ठोक्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ््याला आठ मराठा कन्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाची धून वाजविण्यात आली आणि कोपर्डी येथील अत्याचारित मुलगी आणि जम्मू काश्मिरमधील उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना दोन मिनिटे स्तब्ध होत श्रद्धांजली अर्पण केली. संस्कृती वाघस्कर या चिमुकलीने ‘ऊठ मराठा जागा हो.. क्रांती मोर्चाचा धागा हो’ या कवितेने उपस्थितांना जागे केले. आदिती दुसुंगे , राधा पवार, वैष्णवी माकोने यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाचे कर्तृत्त्व त्यांच्या वीर कवितांमधून मांडले. ‘निसर्गाचे काही नियम नसते तर आमचे रक्तही भगवे असते’, अशा वैष्णवीच्या गगनभेदी शब्दाने अवघा समुदाय सळसळला.
दुपारी १२.५० वाजता भाषणांची सांगता झाली. राष्ट्रगीताने मोर्चा विसर्जित झाल्याची घोषणा झाली. अवघा मराठा परतीकडे निघाला. महागर्दी...आकाशात दाटलेले ढग आणि प्रचंड उकाडा यावेळी होता. एकाही पोलिसांची मदत न घेता मराठा बांधव शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवित परतीच्या मार्गाला निघाले. तब्बल तीन तासानंतरही रस्त्यावरील गर्दी हटली नव्हती. चांदणी चौकात एकाच वेळी चोहोबाजूंनी गर्दी दाटली होती. भगव्या पताकांनी परिसर चैतन्यात न्हाऊन निघाला. मूकपणे मराठा समाजाने संवेदना प्रकट केल्या. कोपर्डी घटनेचा निषेध म्हणून हातावर काळ््या फिती बांधल्या होत्या. कोणालाही धक्काबुक्की किंवा घाईगर्दी न करता समाज बांधव शांतपणे परतले. लाखोंच्या गर्दीने चांदणी चौक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. सकल मराठा समाजाच्या स्वयंसेवकांनी गर्दीचे नियंत्रण शिस्तबद्धपणे केले. वॉकीटॉकीवरून शहरातील गर्दीचा क्षणाक्षणाला आढावा घेतला जात होता. उंच व्यासपीठावरील भाषणे आणि गर्दी टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरे आकाशातून फिरत होते. ओबी व्हॅन, असंख्य कॅमेरे आणि मोबाईलमधून या मोर्चाचे क्षण टिपले गेले. विक्रमी मोर्चा म्हणून या मोर्चाची नगर जिल्ह्याच्या इतिहासात नोंद झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
नगरच्या ऐतिहासिक मराठा क्रांती मूक मोर्चाचा साक्षीदार ठरलेल्या इम्पिरीयल चौकात सकाळी ७ पासून मोर्चेकरी ठाण मांडून होते. मात्र, ९ नंतर या ठिकाणी स्वयंसेवकांनी कडे करण्यास सुरूवात केली आणि हळूहळू येथील गर्दी वाढत गेली. या गर्दीत महिला, तरूण, तरूणी, अपंग, लहान मुले स्वयंस्फू र्तीने सहभागी झाल्याचे दिसून आले. हा मोर्चा मूक मोर्चा असल्याने अखेरपर्यंत आंदोलनकर्त्यांनी मौन पाळत आपला संताप व्यक्त केला.
वाडिया पार्क येथून मोर्चा सुरू झाल्यानंतर माळीवाडा बसस्थानक परिसरातील इम्पिरीयल चौकात मोर्चाचा महत्वाचा टप्पा होता. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असल्याने या ठिकाणाला मोठे महत्व होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन आणि आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या समूहाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि त्यांनी पुढे प्रस्थान केले. सव्वा अकरा वाजता वाडिया पार्क येथून निघालेला मोर्चा इम्पिरीयल चौकात पोहचला.
४वाडिया पार्कमधून निघालेल्या मोर्चात दोन रांगा होत्या. महिला आणि पुरूषांची स्वतंत्र रांग होती. मात्र, इम्पिरीयल चौकातून मोर्चा मार्गात दोन्हीकडे पुरुषांच्या आणि मध्यभागी महिलांची स्वतंत्र रांग होती. या तिन्ही रांगा एकमेकांमध्ये मिसळू नये, यासाठी मध्यभागी स्वयंसेवकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती.