नेत्यांच्या शस्त्रावर टाच!
By Admin | Updated: December 15, 2015 23:17 IST2015-12-15T23:08:33+5:302015-12-15T23:17:05+5:30
अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या शस्त्रावर टाच आणली आहे.

नेत्यांच्या शस्त्रावर टाच!
अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाने नेत्यांच्या शस्त्रावर टाच आणली आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले, खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड या प्रमुख नेत्यांसह ६१ जणांच्या समावेश असून त्यांच्या बंदुका सरकार जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले आहेत़
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे़ दिग्गज नेते रिंगणात आहेत़ बड्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ त्यात मतदार संख्या मर्यादित आहे़ मतदारांचा कौल मिळविण्यासाठी वाट्टेल ते, असे चित्र सध्या तरी आहे़ त्यात साम, दाम, दंड आणि भेद यासारख्या नितीचा वापर होणार असल्याचे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी मध्यंतरीच्या मतदार मेळाव्यात दिले़ त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे़ याचाच एक भाग म्हणून आमदार, खासदारांचे मागील कारनामे लक्षात घेऊन त्यांच्या बंदुका जमा करण्याचा निर्णय झाला आहे़ पोलिसांनी आमदार, खासदारांसह ६१ जणांचा अहवाल सादर केला होता़ त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी कवडे यांनी वरील आदेश दिले आहेत़ हाती आलेल्या अहवालानुसार भाजपाचे खासदार दिलीप गांधी, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, सेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे, बिपीन शंकरराव कोल्हे, माजी आमदार अशोक काळे, विजय गडाख, यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे आणि राष्ट्रवादीचे प्रताप बबनराव ढाकणे यांचे शस्त्र जमा करणाऱ्यांच्या यादीत नावे आहेत़ वरील सर्व राजकीय नेत्यांना शस्त्र जमा करण्याच्या नोटिसा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत़ त्यांनी स्वत: आपल्याकडील शस्त्र जमा करायचे आहेत, अन्यथा पोलिसांकडून जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़
(प्रतिनिधी)