कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात ६ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांची गैरसोय होऊन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून सर्वच दुकानांना दिवसआड उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राजेश मंटाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
मंटाला म्हणाले, या लॉकडाऊनमध्ये गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, लग्नसमारंभासाठी ५० लोकांना परवानगी दिली आहे. याउलट छोट्या व्यावसायिकांच्या दुकानात एका वेळी दोन ते तीन ग्राहक असतात. नियोजन केले तर एका वेळी एकाच ग्राहकाला दुकानात येण्याची परवानगी देता येऊ शकते. तरीही दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. हा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे ज्या दुकानांना उघडण्यास परवानगी आहे. त्यांना एक दिवस व ज्यांना दुकाने उघडण्यास परवानगी नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी दुकान चालू करण्याची परवानगी द्यावी. यामुळे कोणावरही अत्याचार होणार नाही आणि सर्वांचीच रोजीरोटी सुरू राहील.