चाचणीसाठी रीतसर ऑनलाइन अर्ज करून मिळालेल्या वेळेनुसार ट्रॅकवर वाहनांचा रांगा लावल्या जातात. मात्र काही स्थानिक गुंडमध्येच वाहने घुसवून त्यांची तपासणी करून घेतात. त्याकरिता आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरले जाते.
वाहनधारकांची कागदपत्रे हिसकावून घेत कमिशनची मागणी केली जाते. अन्यथा दिवसभर ताटकळत उभे रहावे लागेल अशी धमकी दिली जाते, असा आरोप करण्यात आला आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणारे उपकरण बसविण्यासाठी काही अधिकृत केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या गुंडांनी बोगस केंद्र थाटले असून, तेथूनच कामे करून घेण्याचा दबाव वाहनधारकांवर आणला जात आहे.
आरटीओ कार्यालयाच्या आवारात पत्र्याचे शेड उभारून या गुंडांच्या टोळीकडून ट्रॅकचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे येथील शांततामय वातावरणाला बाधा निर्माण झाली आहे. तातडीने या टोळीला येथून हद्दपार करावे, अशी मागणी चित्ते व मुथ्था यांनी अधिकारी खान यांच्याकडे केली आहे.
---------