४५ वर्षानंतर गाळ काढण्यास मुहूर्त

By Admin | Updated: May 5, 2016 00:02 IST2016-05-04T23:51:21+5:302016-05-05T00:02:24+5:30

जामखेड : जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ ४५ वर्षानंतर प्रथमच लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे.

After 45 years, the Muhurat will be able to remove the mud | ४५ वर्षानंतर गाळ काढण्यास मुहूर्त

४५ वर्षानंतर गाळ काढण्यास मुहूर्त

जामखेड : जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ ४५ वर्षानंतर प्रथमच लोकवर्गणीतून काढण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाला. जामखेड नगर परिषदेने गाळ काढण्यास पुढाकार घेतला असून आजअखेर ४१ लाख रुपये जमा झाले आहेत. शहरातील अनेक दात्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश धस होते. धस म्हणाले, भुतवडा तलावातील गाळ निघावा, याविषयी जनतेच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कोणीही राजकारण न आणता मदत करावी. तालुक्यात अनेक कामासाठी निधी येतो, परंतु गाळ काढण्यास निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. नगरपरिषद निवडणुकीत तलावाच्या वरील बाजूस चार तलाव सुरेश धस यांनी केल्याने तलावात पाणी आले नाही, असा अपप्रचार करण्यात आला. पाणी अडविण्याचे राज्य शासनाच्या धरणातून प्रकल्प झाले. केवळ नकारात्मक दृष्टीने प्रचार करू नका. एखाद्या कामाला निधी आणला तर पोस्टर लावून वाहवा करू नका. तलावाशेजारील जोडतलावाला निधी आणला, टेंडर केले पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिटेंडर करण्याची वेळ आली. आता पावसाळ्यात जोडतलावाचे अपूर्ण काम होणार नाही. या साऱ्या प्रकारात मंत्र्यांची फटफजिती झाली आहे.
यावेळी नगराध्यक्ष प्रिती राळेभात, शिवसेना नेते मधुकर राळेभात, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडखे, पुणे महानगरपालिका सभागृह नेते शंकर केमसे, पुण्याचे नगरसेवक अनिल टिंगरे, विनोद पठारे, फारूक इनामदार, विकास दांगट, महेंद्र पठाडे, उद्योगपती रमेश गुगळे, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय वारे, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, बंकटराव बारवकर, विकास राळेभात, जालिंदर राळेभात, विजयसिंह गोलेकर, फिरोज कुरेशी, राजू गोरे, नगरसेवक अमित जाधव, डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)
दुष्काळाची दाहकता कमी करणार
महापौर प्रशांत जगताप म्हणाले, शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळस्थिती पाहून दुष्काळीपट्टयात फिरुन काम करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आम्ही महापालिकेचे पदाधिकारी व ५६ नगरसेवकांनी एक महिन्याचा पगार, भत्ता व इतर असे ६६ लाख रुपये जमा केले. माजी मंत्री सुरेश धस सुचवतील तेथे देत आहे. त्यांनी आमच्याकडे आधी दहा लाखाची मागणी केली. आता आणखी पाच लाख मागितले, तेही देणार आहोत. ग्रामीण भागातील दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मदतीचा हात देऊन दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही जगताप म्हणाले.
मदतीसाठी हात सरसावले !
माजी मंत्री सुरेश धस यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार उद्योगपती रमेश गुगळे यांनी ५० हजार, विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र राळेभात यांनी ३१ हजार, सोमनी डेव्हलपमेंटतर्फे ३१ हजार, युवक काँग्रेस अध्यक्ष जमीर सय्यद यांनी रोख ५ हजार दिले. बुधवारी एका दिवशी १ लाख १७ हजार रुपये जमा झाले. त्यामुळे लोकवर्गणीचा आकडा ४२ लाख १७ हजार झाला आहे.

Web Title: After 45 years, the Muhurat will be able to remove the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.