उच्च शिक्षणाला फाटा देत ८२५ युवकांना व्हायचेय उद्योजक
By Admin | Updated: June 30, 2014 00:35 IST2014-06-29T23:35:22+5:302014-06-30T00:35:52+5:30
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेमुळे हाऊसफुल्ल आहेत़ मात्र जिल्ह्यातील ८२५ युवकांनी उच्च शिक्षणाला फाटा देत स्वत: चा उद्योग उभारण्याची तयारी सुरू केली
उच्च शिक्षणाला फाटा देत ८२५ युवकांना व्हायचेय उद्योजक
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेमुळे हाऊसफुल्ल आहेत़ मात्र जिल्ह्यातील ८२५ युवकांनी उच्च शिक्षणाला फाटा देत स्वत: चा उद्योग उभारण्याची तयारी सुरू केली असून, जिल्हा उद्योग केंद्राच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत त्यांनी अर्ज दाखल केले आहेत़ जिल्ह्यातील युवकांना उद्योजक व्हायचे असल्याचे यानिमित्तानेसमोर आले आहे़
दहावीच्या निकालापासूनच प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला़ बारावीचे शिक्षण पूर्ण करून काहींनी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांचा रस्ता धरला आहे़ त्यामुळे सर्वच महाविद्यालयांत प्रवेशासाठी कमालीची गर्दी झाली आहे़ अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बड्या कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी युवकांचा संघर्ष सुरू झाला आहे़ तर काहींना विदेशातील नोकरीने भुरळ घातली आहे़ मात्र काही युवकांना नोकरी नको आहे, त्यांना स्वत:उद्योग उभा करून मोठे उद्योजक होण्याची इच्छा आहे़ जिल्हा उद्योग केंद्राच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुशिक्षित युवकांनी स्वत:चा उद्योग उभा करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे़ चालूवर्षीही जिल्ह्यातील ८२५ युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे नावनोंदणी केली आहे़ शासनाने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी पंतप्रधान रोजगार कार्यक्रम आणला आहे़ उत्पादनासाठी २५ लाख, तर सेवा क्षेत्रासाठी १० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ हा कार्यक्रम शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी आहे़ या कार्यक्रमांतर्गत युवकांनी अर्ज केले असून, त्यांना उद्योगासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले़
युवकांना उद्योग सुरू करण्याची इच्छा असते़ परंतु त्यांना प्रशिक्षण मिळत नाही़ त्यामुळे प्रशिक्षणासह कर्ज उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम आहे़ उद्योग सुरू करण्याबरोबरच तो यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यपथक समितीच्या बैठकीत मुलाखतीव्दारे लाभार्थीची निवड केली जाते़ निवड झालेल्या उमेदवारांसाठी बँकेकडे कर्जाची शिफारस समितीमार्फत करण्यात येते़ राष्ट्रीयकृत बँकेकडून उद्योगासाठी २५ लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते़ कर्जाची परतफेड तीन वर्षात करणे बंधनकारक आहे़ उद्योग सुरू करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याने युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव दाखल केले आहेत़ दाखल झालेल्या प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर प्रस्ताव दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले़
उद्योग सुरू करणाऱ्या युवकांसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अनेक योजना आहेत़ मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मोठ्याप्रमाणात कर्ज उपलब्ध होत असून,त्यासाठी अर्जही दाखल होत आहेत़
-एस़ ए़ भामरे, महाव्यवस्थापक,
जिल्हा उद्योग केंद्र.
अशी आहे योजना....
उत्पादनासाठी कर्ज- २५ लाख
सेवा क्षेत्रासाठी- १० लाख
युवक ८ वी उत्तीर्ण आवश्यक
नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी योजना
स्वत:ची गुंतवणूक प्रकल्पाच्या
१० टक्के