जिल्ह्यातील ७५० बसना बंदचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:18 IST2018-08-10T16:17:56+5:302018-08-10T16:18:06+5:30
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्ह्यातील ११ आगारांकडे असलेल्या सर्व ७५० बस डेपोतच उभ्या होत्या. यामुळे एसटी महामंडळाला सुमारे ७० ते ८० लाखांचे नुकसान झाले.

जिल्ह्यातील ७५० बसना बंदचा फटका
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती. जिल्ह्यातील ११ आगारांकडे असलेल्या सर्व ७५० बस डेपोतच उभ्या होत्या. यामुळे एसटी महामंडळाला सुमारे ७० ते ८० लाखांचे नुकसान झाले.
मागील आंदोलनात एसटी बसगाड्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गुरूवारच्या आंदोलन पार्श्वभूमीवर बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. गुरूवारी सकाळी एकाही बसस्थानकातून बस बाहेर पडली नाही. आंदोलन आधीच जाहीर झाल्याने बसस्थानकातही तशी एवढी गर्दी नव्हती किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच पर्यायी व्यवस्था केली होती. त्यामुळे त्या तुलनेत प्रवाशांची गैरसोय होण्याची तीव्रता कमी होती. जिल्ह्यातील ११ आगारांकडे एकूण ७५० बस असून दैनंदिन उत्पन्न ७० ते ८० लाख रूपयांचे आहे. दिवसभर बस बंद असल्याने एसटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, शुक्रवारपासून एसटी बस सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.