नेवासा: फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादळाने शेतकर्यांना त्यांच्या पिकाचे नुकसानीसह घराची झालेली पडझड यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सुमारे ७ लाखांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्या धनादेशाचे लवकरच आ. गडाखांच्या हस्ते वाटप होणार असल्याची माहिती नेवासा तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली. गारपिटीमुळे शेतातील पिकाबरोबरच अनेकांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा तालुक्यातील ११९ गावांना बसला होता. शेतातील सर्व पिके भूईसपाट होवून अनेकांच्या घरावरील छत उडाली होती. आपद्ग्रस्तांना तातडीची मदत मिळणे आवश्यक होते. सरकारी मदतीला आचारसंहितेची अडचण होती. या सर्वांना आ. गडाख यांनी अन्नाचे पाकीट व स्वखर्चातून केलेली मदत २४ तासांच्या आत पोहोच केली होती. शासनाच्या निधीच्या अगोदर स्वखर्चातून मदत आपद्ग्रस्तांना पोहोच केली. त्यानंतर विविध शासकीय अधिकार्यांसमवेत चर्चा करुन जेथे जेथे घराची पडझड झालेली आहे, त्यांचे पंचनामे करावेत म्हणून संपर्क ठेवला. शासन स्तरावर या निधीसाठी पाठपुरावा केला. यासाठी २६ कुटुंबांना ३ लाख ५६ हजाराची मदत व अंशत: घराची झालेली पडझडीसाठी १८३ कुटुंबांना ३ लाख एकोणीस हजार रुपयांची मदत शासनाकडून मिळवून दिली आहे. यापैकी २६ कुटुंबांना प्रत्यक्ष धनादेश वाटप आ. गडाख व तहसीलदार यांच्यामार्फत होणार आहे. १८३ कुटुंबांना तलाठ्यामार्फत हा धनादेश मिळणार असल्याचे तुवर यांनी सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)
गारपीटग्रस्तांना ७ लाखांचा निधी
By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST