अकरावीसाठी ६५ हजार जागा
By Admin | Updated: June 17, 2014 00:37 IST2014-06-17T00:07:04+5:302014-06-17T00:37:31+5:30
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवार

अकरावीसाठी ६५ हजार जागा
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचानिकाल मंगळवार (आज दि.१७) मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर होणार आहे. दुपारी १ नंतर संकेतस्थळावर आॅनलाईन पध्दतीने हा निकाल पाहता येणार आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी कला, शास्त्र आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये ६५ हजार जागा आहेत.
निकालानंतर काही ठरावीक ठिकाणी प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांची मार्च २०१४ ला दहावीची परीक्षा झाली होती. जिल्ह्यातून यंदा परीक्षेसाठी ७३ हजार ७९५ विद्यार्थी बसले होते. दहावीचे परीक्षा फॉर्म परीक्षा मंडळाने आॅनलाईन भरून घेतल्याने अनेक ठिकाणी अडचणी आल्या होत्या. त्यावर ऐनवेळी मात करत परीक्षा पार पडल्या होत्या. या परीक्षेचा आज निकाल जाहिर होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कला शाखेच्या ३४३ तुकड्या असून त्या ठिकाणी २९ हजार ५२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. विज्ञान शाखेच्या २७२ तुकड्या असून २४ हजार ५२० क्षमता असून वाणिज्य शाखेच्या ८१ तुकड्या असून ७ हजार ९६० आणि संयुक्त शाखेच्या २० तुकड्या असून त्या ठिकाणी १ हजार ६८० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात तिन्ही विभागाच्या ७१४ तुकड्या असून ६३ हजार ६०० प्रवेश क्षमता आहे. २६ जूनला प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेची मूळ गुणपत्रिका मिळणार आहे. त्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शहरात दहा हजार प्रवेश क्षमता
नगर शहर आणि उपनगरात अकरावी प्रवेशासाठी मराठी माध्यमाचे ३१, उर्दू माध्यमाचे ३ आणि इंग्रजी माध्यमाचे कनिष्ठ महाविद्यालय अथवा उच्च माध्यमिक विद्यालय आहे. यात कला शाखेच्या ४४ तुकड्या आणि ३ हजार ९६० प्रवेश क्षमता, विज्ञान शाखेच्या ३६ तुकड्या आणि ३ हजार ३२० प्रवेश क्षमता, वाणिज्य शाखेच्या २ हजार ४०० प्रवेश क्षमता आणि संयुक्त माध्यमाच्या २ तुकड्या आणि १६० प्रवेश क्षमता आहे. असे शहरात १०७ तुकड्यांतून ९ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
गुणवंतांचे कौतूक आम्ही करु ..
दहावीत ज्या विद्यार्थ्यांना ९५ किंवा त्यापेक्षा अधिक टक्के गुण मिळाले आहेत, त्यांनी आपले छायाचित्र आणि गुणपत्रिकेची झेरॉक्स लोकमत कार्यालयात आणून द्यावी.