जिल्ह्यात ३४ वादळग्रस्त शाळा
By Admin | Updated: June 9, 2014 00:03 IST2014-06-08T23:48:28+5:302014-06-09T00:03:55+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात २ जून ते ८ जून दरम्यान झालेल्या वादळात सात तालुक्यातील ३४ प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ३४ वादळग्रस्त शाळा
अहमदनगर : जिल्ह्यात २ जून ते ८ जून दरम्यान झालेल्या वादळात सात तालुक्यातील ३४ प्राथमिक शाळांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक शाळा एकट्या शेवगाव तालुक्यातील १३ असून समसूद ऐरंडगाव या गाव आणि परिसारातील सहा शाळांचा समावेश आहे. सोमवार (आज) पर्यंत या वादळग्रस्त शाळांची माहिती जिल्हा परिषदेत संकलित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिला. यात सुमारे ७०० हून अधिक घरांचे नुकसान होत शेकडो कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. वादळात सहा जणांचे बळी गेले असून जनावरे, वीजेचे खांब यांचे नुकसान झालेले आहे. यासर्व ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्तीच्या निधीतून भरपाई देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी देखील जिल्हा प्रशासनाकडून मदत घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी सांगितले. यासाठी वादळग्रस्त शाळांचे फोटो, पंचनाम्यांची माहिती आज संकलित होणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी सांगितले.
जिल्ह्यात अजून तीन-चार तालुक्यातील माहिती संकलीत होणे बाकी असून तेथील माहिती मिळाल्यावर वादळग्रस्त शाळांचा आकडा वाढणार आहे. दरम्यान, येत्या १६ जूनला शाळा सुरू होणार आहे. संबंधीत ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीने संबंधीत गावच्या ग्रामपंचायती मार्फत पर्यायी ठिकाणी शाळा भरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वांबोरीत जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात आल्या होत्या. त्या शाळा खोल्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
वादळग्रस्त शाळांची तालुकानिहाय नावे
शेवगाव : समसूद ऐरंडगाव- सहा, आधोडी, राक्षी, लोहगाव, नजनवस्ती, जमधाडेवाडी, आखातेवाडी, आव्हाणे.
नेवासा : देवगाव, हरहर.
राहुरी : वांबोरी.
पाथर्डी : तुळजावाडी, वडगाव.
राहाता : अस्तगाव.
संगमनेर : वैदूवाडी, येठेवाडी, सांगळेवाडी.
अकोले : सरोदे वस्ती.