जिल्ह्यात २२३ संभाव्य पूरग्रस्त गावे
By Admin | Updated: June 11, 2016 23:50 IST2016-06-11T23:43:07+5:302016-06-11T23:50:19+5:30
अहमदनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१६-१७ चा साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे

जिल्ह्यात २२३ संभाव्य पूरग्रस्त गावे
अहमदनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २०१६-१७ चा साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये २२३ गावे संभाव्य पूरग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यासह पावसाळ्यात गेल्या तीन वर्षात ज्या गावात साथजन्य आजारांचा उद्रेक झाला होता, अशा ९ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी साथ नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पूरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करते. या आराखड्यानुसार पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.
संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आली आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहे. तालुकानिहाय यात्रा उत्सव, धार्मिक क्षेत्र असणाऱ्या गावांची यादी आराखड्यात निश्चित करण्यात आली आहे. आराखड्यातील नियोजनानुसार पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात काय उपाययोजना करायच्या याची निश्चिती करण्यात आली आहे.
पावसाळ्यात व पावसाळ््यानंतर जलजन्यव कीटकजन्य आजारांची साथ निर्माण होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात.
यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणुजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. पुराच्या पाण्याचा संपर्क आल्याने लेप्टोस्पॉयरॉसिस आजार उद्भवतो. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही आढळतो.
यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता पावसाळ्यात साथ जलजन्य व कीटकजन्य साथी उद्भवू नयेत व साथ आल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.
(प्रतिनिधी)
आरोग्य विभागाचा सल्ला
उघड्यावरील अन्नपदार्थ, कापलेली फळे खाऊ नका, उघड्यावरील व माशा असलेले अन्न खाऊ नका, शिळे अन्नपदार्थ खाऊ नका, उघड्यावर शौचास बसू नका, अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नका, पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्यावे, पिण्याचे पाणी झाकून ठेवावे तसेच पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करावा, आरोग्य तक्रार असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
पूरग्रस्त गावे अशी...
पारनेर १४, कोपरगाव २१, जामखेड ३, शेवगाव १, नगर ९, अकोले १४, संगमनेर १७, राहाता ५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २७, राहुरी ३९, नेवासा २७, कर्जत २३ यांचा समावेश आहे. ही सर्व गावे मुळा, प्रवरा, गोदावरी, भिमा आणि घोड आदी नद्यांच्या काठावर वसलेली आहेत.
गेल्या वर्षी शेवगाव तालुक्यातील आधोडी, ढोरसडे, राहुरीमधील टाकळीमियाँ, पाथर्डीतील मोहटे, जिरेवाडी, अकोले तालुक्यातील काळकाई कारवाडी, टाहाकारी, नगरमधील पारेवाडी, वाळकी, श्रीरामपुरातील लाडगाव, राहाता तालुक्यातील पुणतांबा, पारनेर पिंप्री जलसेन, संगमनेमधील आश्वी बुद्रूक या गावात साथजन्य आजारांचा उद्रेक झाला होता.