दीडशे कोटी लिटरचा जलसंचय
By Admin | Updated: October 12, 2016 01:08 IST2016-10-12T00:32:24+5:302016-10-12T01:08:23+5:30
शेवगाव : चार वर्षांपासून शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांत गंगामाई साखर कारखान्यातर्फे स्वनिधीतून जलसंधारणाची बंधारे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे

दीडशे कोटी लिटरचा जलसंचय
शेवगाव : चार वर्षांपासून शेवगाव, नेवासा व पाथर्डी तालुक्यांत गंगामाई साखर कारखान्यातर्फे स्वनिधीतून जलसंधारणाची बंधारे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे जवळपास दीडशे कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास, तसेच अधिक ऊस उत्पादनास मदत मिळाली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी दिली.
नजीक बाभूळगाव (ता. शेवगाव) येथील गंगामाई इंडस्ट्रीज अॅण्ड कन्स्ट्रक्शन लिमि.च्या सहाव्या गळीत हंगामाचा अग्निप्रदीपन सोहळा विजयादशमीदिनी कार्यकारी संचालक रणजित मुळे, त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ते बोलत होते. मुळे म्हणाले, गळीत हंगाम २०१६-१७ साठी कारखाना भागात सुधारित जातीचे को ८६०३२ व व्ही.एस. आय. ०८००५ ऊस जातीचे बेणे व प्रेसमडपासून बनविलेले कंपोस्ट खत अल्प दरात कारखान्यातर्फे बिनव्याजी उधारीने देण्याचे धोरण आहे. कारखान्याच्या जलसंधारण कामामुळे परिसरातील बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. पावसाळ्यानंतर बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदी करण्याचे काम हाती घेण्याचा मानस आहे.
लता मुळे, अजित सीड्सचे कार्यकारी संचालक समीर मुळे, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस. एन. थिटे, उपाध्यक्ष अंबादास मोरे, व्यवस्थापक एस. डी. पवार, राजेंद्र काळे, रमेश वाळुंज, व्ही. एस. खेडकर, सुभाष बहिरट आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी घोटण, नजीक बाभूळगाव, एरंडगाव, खानापूर, दहिफळ, बोडखे, खुंटेफळ या गावांचे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. रमेश कचरे यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे अंबादास मोरे यांनी प्रास्ताविक केले. अर्जुन मुखेकर यांनी आभार मानले.