- नीता ब्रह्मकुमारीभले बुरे ते घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर...या वळणावर सर्व ब्रह्मवत्सांना संगमयुगावर मिळालेला हा नवीन जन्म, या जन्मामध्ये चांगले-वाईट जे काही आपण आपल्या मनाच्या तिजोरीत बंद करून ठेवले आहे त्याला ईश्वर चरणी स्वाहा करण्याची ही उत्तम वेळ आहे. या चंचल मनामध्ये जे काही साठवून ठेवले आहे, जोपर्यंत त्या सर्व गोष्टी, प्रसंग आपण डीलिट (काढून टाकत) करत नाही तोपर्यंत शिवबाबाकडून जे रोज मुरलीद्वारे नवीन, निराळे ज्ञान मिळत आहे, त्याचा संग्रह होऊ शकत नाही.
एखाद्या वस्तुसंग्रहालयामध्ये कितीतरी वर्षांपूर्वींच्या वस्तू विशेष जमा केल्या जातात. त्यांना बघण्यासाठी मुनष्य खास त्या ठिकाणी भेट देतात. आपल्या या जीवनात आपण जर जुन्या गोष्टींचा, प्रसंगांचा संग्रह करण्याऐवजी त्या प्रसंगातून मिळालेली शिकवण जपून ठेवली तर त्याचा नक्कीच आपल्याला भावी जीवनामध्ये लाभ होऊ शकतो. पौराणिक काळातील अनेकानेक राजे जे शूरवीर होऊन गेले, त्यांच्या छोट्या-छोट्या वस्तू जसे चमचे, सुरी, बटण हेसुद्धा सांभाळून ठेवले जाते.
शिवबाबा तर आपल्याला त्याच्याही आधीचा काळ स्मृतीत आणण्यासाठी रोज मुरलीमध्ये सत्ययुगी दुनियेचे वर्णन करत असतात. आपण ते प्रसंग आठवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या सुखाचा अनुभव करण्याचा ध्यास घेतला तर नक्कीच आपले वर्तमान जीवनसुद्धा समाधानी होईल. मनोवैज्ञानिकांच्या दृष्टीने आपल्या मनात दिवसभरात ३0 हजार किंवा त्याहूनही अधिक विचार येतात.
थोडं थांबून जर त्याचे अवलोकन केले की माझे हे मन नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करण्यात व्यस्त आहे तर आढळून येईल की निरर्थक, नकारात्मक, प्रश्नार्थक विचारांच्या गोंधळात ते फसले आहे. कोणत्या मार्गाने जावे, काय करावे यांची गुंतागुंत दिसून येते. मनाची ही ओढाताण थांबवायची असेल तर मनाला सदविचारांनी भरण्याचा पूर्ण प्रयत्न करायला हवा.