संयमातून आनंदाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 08:35 PM2019-09-13T20:35:19+5:302019-09-13T20:35:49+5:30

आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

Experience of joy from Moderation | संयमातून आनंदाचा अनुभव

संयमातून आनंदाचा अनुभव

Next

- रमेश सप्रे

गोष्ट तशी अनेकांना माहीत असलेली. गोष्ट कसली प्रसंगच आहे तो. श्याम आणि त्याचे आई वडील यांच्या मधला. श्याम म्हणजे आपले सानेगुरूजी, श्यामची आई म्हणजे संस्कारांची साक्षात् मूर्ती, संस्कारदेवता. ‘मातृदेवो भव’ म्हणताना मुख्य भाव हा संस्कारांचा म्हणजे हल्लीच्या भाषेत मूल्य शिक्षणाचा (व्हॅल्यू एज्युकेशनचा) असतो. काही संस्कार घडतात तर काही घडवले जातात. या प्रसंगात हे दोन्ही प्रकार दिसतात. श्यामच्या आईवडिलांनी त्याच्यावर घडवलेले संस्कार तर कुटुंबातील वातावरण, परस्परातील स्नेहबंध यातून घडलेले संस्कार. त्याचं असं झालं-

श्याम हा आपल्या गुणांमुळे नि स्वभावामुळे सर्वाचा लाडका होता. त्याच्या आईचा तर तो जीव की प्राण होता. शाळेत असताना शिक्षणासाठी त्याला अनेक गावी जाऊन निरनिराळ्या शाळांतून शिक्षण घ्यावं लागलं. अशावेळी तो सुटीसाठी जेव्हा घरी येई तेव्हा सर्वाना अर्थातच खूप आनंद होई. आईला तर जास्तच. घरची गरीबी असल्यामुळे अनेक गोष्टी मनात असूनही करता येत नसत; पण असं असलं तरी प्रेम, सेवा, त्याग अशा संस्कारांची श्रीमंती त्यांच्या कुटुंबात होती. गरीबी म्हणजे दारिद्रय़ नव्हे. गरीबी ही आर्थिक परिस्थितीवर तर दारिद्रय़ हे मनाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. गरीबी ही बऱ्याच वेळा शाप नसून वरदान ठरू शकते. श्यामला संस्कारांच्या दृष्टीनं संपन्न घरच्या या गरीबीनंच बनवलं असेल त्या परिस्थितीत मनाचं समाधान कसं टिकवायचं हे वडिलांकडून तर अखंड आनंदात कसं राहायचं हे आईकडून श्याम शिकला. एवढंच नव्हे तर वरवर दिसणाऱ्या या दु:खालाही आनंदाची झालर कशी लावायची याचंही शिक्षण मिळाल्यामुळे श्याम हा स्वत: संस्कारसंपन्न, सुसंस्कृत झाला असं नव्हे तर मराठी जाणणाऱ्या या मुलांच्या तसेच वडील मंडळींच्या मनावरही त्यानं संस्कारांचं सुरेख सिंचन केलं.

श्यामची आई ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर संस्कारांचा संतत अभिषेक करणारी शक्ती होती. अशातूनच आनंदाची अखंड अनुभूती घेता येते. एके दिवशी श्याम येणार म्हणून आईनं त्याला आवडणारी फणसाची भाजी करण्याचं ठरवलं. एरवी श्यामची आई सुगरण नि अन्नपूर्णा दोन्ही होती. ती म्हणायची, ‘भोपळीचा, भेंडीचा, शेवग्याचा कोणताही कोवळा पाला ही पालेभाजीच असते. तिखट, मिठ नि तेलाची फोडणी दिली तर सारं गोड लागतं.’ नुसती म्हणायचीच नाही तर तिच्या स्वयंपाकातून याचा अनुभव सर्वाना रोज येत असे. तो आनंदाचा अमृतानुभव असे.

त्या दिवशी वडिलांनी पाटीलवाडीहून भाजीसाठी फणस आणला. तो जून असेल (म्हणजे कोवळा नसेल) तर ‘उकडगरेच करा’ असंही सांगितलं. आईनं भाजी करायला घेतली ती चिरून शिजवून पानात वाढेपर्यंत तिच्या डोळ्यातून आसवं ओघळत होती. हे सर्वाच्या लक्षात आलं. आधी चुलीचा धूर नि त्यात भावनांचा पूर मग काय विचारता? आईची भावविव्हळ अवस्था सर्वाच्या लक्षात आली. जेवायला सुरुवात केल्यावर पहिल्याच घासाला सगळ्यांच्या लक्षात आलं की भाजीत आई मीठ घालायला विसरल्यामुळे ती अळणी झाली आहे. नेहमीच्या स्वभावाप्रमाणे श्याम जोरात म्हणाला, ‘आई, पण तो पुढे काय म्हणणार इतक्यात वडिलांनी सर्वाना गप्प बसून मुकाटय़ानं भाजी खाण्यास सांगितली. स्वत:ही ‘काय फक्कड झालीय भाजी, एकदम राजमान्य, म्हणजे राजालाही आवडेल अशी!’ असं म्हणत ती अळणी भाजी मिटक्या मारीत खाल्ली. आईच्या लक्षात येऊन तिला वाईट वाटू नये म्हणून पानात वाढलेलं मीठही भाजीला लावलं नाही. मुलांनीही भाजी खाल्ली. शेवटी आई जेवायला बसली. पहिला घास खाताच तिच्या लक्षात आलं की भाजीत मीठ घालायचं राहून गेलं. तिनं हाक मारली. ‘श्याम’ तो आल्यावर आसूभिजल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली, ‘अरेरे, अळणी भाजी तुम्ही सर्वानी खाल्लीत ना? तू तरी सांगायचंस श्याम’ यावर श्यामनं घडलेला सारा प्रसंग सांगितला.

खरंच, श्याम म्हणतो त्याप्रमाणे आपल्या विसरभोळेपणामळे सर्वाना अळणी, बेचव भाजी खावी लागली म्हणून हळहळणारी माझी आई श्रेष्ठ की संयम पाळून सतत कामात असलेल्या आईला समजून घेऊन संयमानं वागून घरात समाधान राखणारे वडील श्रेष्ठ याचा निर्णय लागणं कठीण आहे. दोघांनीही आपापल्या वागण्यातून मोलाचे संस्कार घडवले होते. ते खरे सुसंस्कार होते. सर्वाना आनंद देणारे. सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण, आर्थिक सुबत्ता, सत्ता यापैकी काहीही फार महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते वातावरण आणि सुसंस्कृत व्यक्तींचा सहवास. श्यामच्या भाग्यानं त्याला मिळाला. त्यातूनच पुढे साकारले साने गुरूजी. ते जसे सर्वाचे ‘गुरुजी’ होते तशीच सर्वाची आईही होते. गुरुमाउली होते.

आनंदाची निर्मिती करावयाची नसते. ती आपोआप होत असते. आणि आपण ती उत्स्फूर्तपणे अनुभवयाची असते. अनुभव हाच आनंदाचा गाभा असतो. प्राण असतो. 

Web Title: Experience of joy from Moderation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.