शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लस न घेण्याचे द्यावे लागेल कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 05:00 AM2021-10-14T05:00:00+5:302021-10-14T05:00:11+5:30
जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत. या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी त्यांना खुलासा मागितला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद अंतर्गत अजूनपर्यंत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही. त्यामुळे ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या १५२ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी खुलासा मागितला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून कित्येकांना त्यांच्या स्वकीयांपासून हिरावून नेले आहे. अशात आता कोरोनाला मात करण्यासाठी लस उपलब्ध असून या लसींमुळे एकतर बाधित व्यक्तीला गंभीर परिणाम होत नाही. शिवाय त्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला लागण होत नसल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
यामुळेच शासन व प्रशासन कोरोना लसीकरणासाठी धडपडत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळेच कोरोना आता नियंत्रणात आला आहे.
हीच बाब हेरून आता शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असून ५ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत.
या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी त्यांना खुलासा मागितला आहे.
लवकरात लवकर लस घ्या- पाटील
- शासनाकडून कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत बोलले जात आहे. मात्र ही लाट कुणालाही परवडणारी राहणार नसून त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. याकरिता ज्या विद्यार्थ्यांच्या पालक व गावकऱ्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशांनी १६ ऑक्टोबरपर्यंत पहिला डोस घ्यावा. तसेच यासाठी त्यांना विद्यार्थी, ग्रामपंचायत, युवक मंडळ, बचत गट व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत प्रोत्साहित करावे असे मुकाअ पाटील यांनी सुचविले आहे.