कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:00 PM2018-12-30T22:00:23+5:302018-12-30T22:02:37+5:30

वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली.

He took the night out in the cold winter | कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

कडाक्याच्या थंडीत त्यांनी उघड्यावर काढली रात्र

Next
ठळक मुद्देरस्त्यासाठी हटविले अतिक्रमण : महिनाभरापूर्वीच बजावल्या होत्या नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. शेकोट्या पेटवून जागणाऱ्या नागरिकांनी शासकीय धोरणावर प्रचंड रोष नोंदविला. संवेदनाहीन लोकप्रतिनिधींमुळेच उघड्यावर पडल्याची तिखट प्रतिक्रिया या नागरिकांनी नोंदविली.
गतवर्षी फेबु्रवारी महिन्यातच धामणगाव रोड ते लोहारा या बायपास मार्गाच्या रुंदीकरण प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. हायब्रीड अ‍ॅन्यूईटी मॉडेलच्या माध्यमातून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने रस्त्यासाठी अतिक्रमण काढण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्या होत्या. पावसाळा आणि नंतर दिवाळी आल्यामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. आता प्रत्यक्ष कामकाज करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारपासून ४०० मिटर रस्ता रुंदीकरणावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.
यावेळी वातावरणाचा कुठलाही विचार केला गेला नाही. गुरूवारपासून संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरली. यानंतरही त्याचा विचार न करता सलग दोन दिवस अतिक्रमण मोहीम राबविली गेली. यातील अनेक कुटुंबीयांना पर्यायी व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे अशा कुटुंबीयांनी कृषी विज्ञान केंद्राच्या जागेवर आश्रय घेतला. त्यावर पाल ठोकून उघड्यावर कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढली. काही कुटुंबीयांनी तर बसस्थानक, लोहारा मंदिर, शहरातील केदारेश्वर मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात धाव घेतली. दोन दिवस थंडीचा सामना केला.
अतिक्रमणधारकांना घरकुल देण्याची मागणी
शनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा मुद्दा खासदार भावना गवळी यांनी उचलून धरला. त्यावर विचार होईल, असे सांगण्यात आले. मात्र ही प्रक्रिया राबवताना प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याची बाब पुढे आली आहे. वर्षभरापासून हा विषय प्रशासनापुढे असतानाही ठोस उपाययोजना झाल्या नाही.
रोजगाराचे कटले तुटले
अतिक्रमणधारकांच्या घरावर बुलडोझर चालविताना त्यामध्ये असलेले लोटगाडे मोडले गेले. यामुळे चहा कॅन्टीन, फळ-भाजीविक्रेत्यांचा रोजगारही बुडला. आता घरही नाही अन् रोजगारही नाही, असे दुहेरी संकट नागरिकांना सोसावे लागत आहे.

Web Title: He took the night out in the cold winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.