२४० नगरांना मिळणार गोखीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:24 PM2018-04-26T23:24:36+5:302018-04-26T23:24:36+5:30

निळोणा आणि चापडोहच्या साथीला येत असलेल्या गोखीचे पाणी शहरातील २४० पेक्षा अधिक वसाहतींना मिळणार आहे. दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला या प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे.

240 cities will get access to water | २४० नगरांना मिळणार गोखीचे पाणी

२४० नगरांना मिळणार गोखीचे पाणी

Next
ठळक मुद्दे१ मे पासून पाणीपुरवठ्याचा अंदाज : दर्डानगर, सुयोगनगर व लोहारा येथील टाक्यांमध्ये सोडणार पाणी

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निळोणा आणि चापडोहच्या साथीला येत असलेल्या गोखीचे पाणी शहरातील २४० पेक्षा अधिक वसाहतींना मिळणार आहे. दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला या प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. पाईपलाईन काम सुरू असून औद्योगिक वसाहतीच्या जलशुध्दीकरण केंद्रावर मोटरंपाची चाचणीही घेण्यात आली आहे. १ मेपासून या प्रकल्पाचे पाणी मिळणार असे सांगितले जात आहे.
ही तातडीची नळयोजना ४४ लाख रुपयांची आहे. एमआयडीसी ते लोहारा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेला व्हॉल, अशी सव्वादोन किलोमीटर पाईपलाईन टाकली जात आहे. या व्हॉलला नवीन लाईन जोडून लोहारा, सुयोगनगर आणि दर्डानगर टाकीमध्ये पाणी घेण्यात येणार आहे. दर्डानगर ते लोहारा अशी पाईप लाईन आहे, मात्र आता उलटी गंगा वाहणार आहे. लोहारा येथे नवीन व्हॉल बसवून पाणी वर ओढले जाणार आहे. या प्रकल्पाचे पाणी सुरू झाले तरी पुरवठ्याचा कालावधी सध्या आहे, तोच राहणार आहे. चापडोहचा मृत साठाही संपत आला आहे. निळोणा फ्लोटिंग पंपावर आहे. या प्रकल्पाचे पाणी आणखी काही दिवस पुरविण्यासाठी गोखीचे पाणी मोठा आधार ठरणार आहे.
दारव्हा मार्गावरील सुयोगनगर टाकीवरून तिरुपतीनगर, सिंचननगर, महावीरनगर भाग १ व २, बसवेश्वरनगर, पोलीस मित्र सोसायटी, तेलंग ले-आऊट, द्वारका नगरी, कमला पार्क, देवीनगर, शिवाजीनगर आदी भागांना पाणीपुरवठा होतो. या भागाला गोखीचे पाणी मिळणार आहे.
दर्डानगर टाकीवरील वाघापूर झोन (महात्मा फुले सोसायटी) सिंघानियानगर, आर्णी नाका, अंजनेय सोसायटी, ठाकूर प्लॉट, सुखकर्तानगर, रंभाजीनगर, वैशाली सोसायटी, महात्मा फुले सोसायटी, रेणुका नगरी, राऊतनगर, सावित्रीबाई फुले सोसायटी, वनकर ले-आऊटचा खालचा भाग, शांतीनगर, मुलकी, महालक्ष्मीनगर, सारंग सोसायटीचा खालचा भाग, गोविंदनगर, जनक नगरी, त्रिमूर्तीनगर, भाग्योदय सोसायटी, वडगाव गावठाण, समीर ले-आऊट, शिवनेरी, श्रमिक कॉलनी आदी भागाच्या नळाला गोखीचे पाणी येणार आहे.
दर्डानगर टाकीवरील वडगाव झोनमधील दर्डानगर परिसर, पुष्पकुंज सोसायटी, प्रभातनगर, प्रजापतीनगर, उज्ज्वलनगर, कुंदननगर, खांदवे ले-आऊट, अमराई, एकवीरानगर, बिजवे ले-आऊट, सुभाषनगर, कावेरी पार्क, एकलव्यनगर, तिरुपतीनगर, परोपटे ले-आऊट, पृथ्वीराजनगर, पल्लवी लॉन मागील परिसर, एसटी कॉलनी, महाबलीनगर, बेले ले-आऊट, रुद्रास कॉलनी, आकाशनगर, रविराजनगर, नृसिंह सोसायटी, तुकडोजी नगर, समतानगर, साईनगरीतील भागाला गोखीचे पाणी येणार आहे. जांब रोड परिसर, दांडेकर ले-आऊट, त्रिमूर्तीनगर, जयसिंगपुरे ले-आऊट, मुंगसाजीनगर, सारंग सोसायटी, गोविंदनगर, समीर ले-आऊट या भागात गोखीचे पाणी येणार आहे.
ओम कॉलनी, गुरुकृपा नगर, निरोही नगर, धनश्री नगर, राजहंस सोसायटी, महादेव नगर, काळे ले-आऊट, ईश्वरनगर, सारंग सोसायटी व विकास कॉलनीचा काही भाग तसेच श्रमिक सोसायटी, भाग्योदयनगर, महालक्ष्मीनगरचा काही भागाला गोखीचा पाणीपुरवठा होणार आहे. या वृत्तामध्ये परिसराचा उल्लेख करताना जवळपासचा भाग देण्यात आला.
नगराध्यक्षांकडून पाहणी
तातडीच्या या कामाची नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी पाहणी केली. ३० एप्रिलपर्यंत गोखीचे पाणी शहराला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जलशुध्दीकरण केंद्रावर ६० हॉर्स पॉवरचे दोन पंप लावले. १६० केव्हीचे ट्रान्सफार्मर बसविले. ही क्षमता वाढवून घेण्यासाठी वीज कंपनीकडे एक लाख ९७ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष चौधरी यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती मंडळाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद जवंजाळ, अधीक्षक अभियंता चार्थळ यांच्या सहकार्याने मोर्शी येथून पम्प आणि ट्रान्सफार्मर उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
चापडोह आणि निळोणा आटले
एकीकडे गोखीचे पाणी सुरू होणार असले तरी दुसरीकडे चापडोह आणि निळोणाचे पाणी संपत आहे. चापडोहवरून वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर या टाक्या भरल्या जातात. निळोणावरून गोदनी रोडवरील टाक्या भरतात. पाणी संपल्यास हाहाकार माजण्याची भीती आहे. गोखीच्याच पाण्याचा पुरवठा सुरू राहणार आहे. दुजाभाव होतो, अशी ओरड होणार आहे. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.
गरज २३ लाख लिटर, मिळणार २० लाख
गोखीचे पाणी घेण्यासाठी २०० मीमी व्यासाची पाईपलाईन टाकली जात आहे. तासी दोन लाख लिटर याप्रमाणे २० लाख लिटर पाण्याचा उपसा केला जाणार आहे. तशी एमआयडीसीची अट आहे. सदर परिसरासाठी २३ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र २० लाख लिटरच पाणी मिळणार असल्याने काही अंशी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 240 cities will get access to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.