लोणारच्या पर्यटन विकासात एसटी महामंडळाचा खोडा; शहरात आगारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:49 PM2017-11-16T13:49:16+5:302017-11-16T14:22:21+5:30

लोणार येथे एसटीचे आगारच नसल्याने मेहकर येथून लोणारसाठी बसगाड्या सोडण्यात येता. त्याचा फटका देशी, विदेशी पर्यटकांना बसत आहे.

ST corporation excavation in development of Lonar tourism | लोणारच्या पर्यटन विकासात एसटी महामंडळाचा खोडा; शहरात आगारच नाही

लोणारच्या पर्यटन विकासात एसटी महामंडळाचा खोडा; शहरात आगारच नाही

Next
ठळक मुद्देपर्यटकांना घ्यावा लागत आहे खासगी वाहनाचा आसरा

लोणार : जागतिक  आश्चर्य असलेल्या लोणार सरोवर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने चांगला उपयोग होऊ शकतो. त्यानुषंगाने नागरिक, पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देण्यासाठी येतात. मात्र लोणार येथे एसटीचे आगारच नसल्याने मेहकर येथून लोणारसाठी बसगाड्या सोडण्यात येता. त्याचा फटका देशी, विदेशी पर्यटकांना बसत आहे.

नाही म्हणायला येथे बसस्थानक आहे. पण त्याचे नियंत्रण हे मेहकर येथून होते. ऐतिहासिक, धार्मिक, वैज्ञानिक, पुरातत्वीय संदर्भाने लोणारचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे येथे देश, विदेशातून पर्यटक वैज्ञानिक येतात. परंतू प्रवासाच्या योग्य सुविधा नसल्याने अडचणी आहेत. त्यामुळे जादा खर्च करून खासगी वाहनाचा आसरा पर्यटकांना घ्यावा लागत आहे.
येथील महत्त्व पाहता येथे लांब पल्ल्याच्या बसगाड्या सोडण्यात येऊन प्रवाशी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी प्रवाशी सेवा संघाने वारंवार मागणी केली आहे. काही बसफेर्याही सुरू झाल्या त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. मात्र लांब पल्ल्याच्या बसगाड्या बंद करण्यात आल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे आहे. खासगी वाहतुकीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कथितस्तरावर हे प्रयत्न झाल्याची ओरड सध्या येथे होत आहे. प्रकरणी १४ नोव्हेंबरला राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास लोणारसाठी लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू करण्याची मागणी लोणार प्रवासी सेवा संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

पर्यटन वाढीस अडचण
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, जळगाव जामोद, चिखली, आणि मलकापूर या चार आगारापैकी एकाही आगारीच बसफेरी ही लोणारसाठी सुटत नाही. त्यामुळे पर्यटकांना अडचण येते तर खासगी अवैध प्रवाशी वाहतुकीचे फावते. त्यामुळे येथून बसफेर्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आहे.
 
या  बसफेरी सुरू होण्याची गरज
पर्यटन वाढीसाठी लोणारला भंडारा, जळगाव, नांदेड, अमरावती, बीड विभागातून बसफेर्या सुरू करण्याची गरज आहे. भंडारा जिल्हयातील पवनी ते लोणार ही बसफेरी सुरू करण्याची गरज आहे. सोबतच औरंगाबाद येथून सकाळी सव्वा आठ वाजता सोडण्यात येणारी बसफेरी सकाळी सव्वा सात वाजता सोडण्यात यावी, अशी मागणी आहे. लोणार-बीड ही  गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेली बस नियमित स्वरुपात सुरू आहे. मात्र ती थेट अक्कलकोटपर्यंत पाठविण्यात यावी, अशी प्रवाशी, भाविक व नागरिकांची मागणी आहे. लोणार येथून सकाळी आठ वाजता ही बस निघाल्यास बीड, मांजरसुंबा, येरमाळा, येडशी, उस्मानाबाद, तुळजापूर आणि सोलापूर मार्गे अक्कल कोट येथे पोहोचू शकले. तेथून सकाळी साडेपाच वाजता ती लोणारसाठी सुटावी, अशी मागणी आहे.

जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांना प्रवाशी सुविधा मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढून शहरातील पर्यटन व्यवसाय वाढेल. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल. - भागवत खरात, सचिव, प्रवाशी सेवा संघटना, लोणार.

Web Title: ST corporation excavation in development of Lonar tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.