तुंगारेश्वर अभयारण्य अतिक्रमणांच्या विळख्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:02 AM2019-07-16T01:02:14+5:302019-07-16T01:02:21+5:30
वन्यजीवांना हक्काची जागा मिळावी म्हणून ८७५० हेक्टरचे तुंगारेश्वर अभयारण्य २००३ साली घोषित करण्यात आले.
पारोळ : वन्यजीवांना हक्काची जागा मिळावी म्हणून ८७५० हेक्टरचे तुंगारेश्वर अभयारण्य २००३ साली घोषित करण्यात आले. सध्या ते अतिक्रमणांच्या विळख्यात असून अभयारण्याच्या शिवणसई, चांदीप, शिरसाड, बावखल, पेल्हार, सातीवली, चिंचोटी इ. भागात अतिक्रमणे झाल्याने वन्यजीवांचा रहिवास धोक्यात आला आहे. तर माणसाने त्यांच्या जागेवर अतिक्रमण केल्याने वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागल्याचे वन्यप्रेमीचे म्हणणे आहे.
बेसुमार वृक्षतोड, अनधिकृत बांधकामे, पर्यटकांचा धिंगाणा, प्लास्टिकचा कचरा, दारूभट्ट्या आदी कारणांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासावर विपरित परिणाम झाला आहे. अभयारण्य म्हणजे जिथे प्राणी-पक्षी निर्भयपणे फिरू शकतात. मात्र मानवी अतिक्र मणामुळे या अरण्यातील प्राणी-पक्ष्यांचे भय वाढत चालले असून हे अभयारण्य आता ‘भया’रण्य होत आहे. मानवी अतिक्र मणावर नियंत्रण मिळवा, नाहीतर हे अभयारण्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.‘अभयारण्य’ या शब्दातच, त्याचा अर्थ दडलेला आहे. अभयारण्य म्हणजे ज्या ठिकाणी पशू, पक्षी, प्राणी अभयपणे म्हणजेच निर्भयपणे फिरू शकतात, असे अरण्य. परंतु तुंगारेश्वर अभयारण्यात मागील काही कालावधीपासून मोठ्या प्रमाणात महाकाय वृक्षांची तोड करून वनसंपत्तीचा ºहास करणाऱ्या तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच मातीभराव करून बेकायदा बांधकामे केली आहेत.त्याचा विपरीत परिणाम होतो आहे.
>भूमाफियांचा धिंगाणा
वन परिक्षेत्रात वन तस्करांबरोबर भूमाफियांच्या बेकायदा बांधकामांनी देखील धिंगाणा घातला आहे आदिवासींच्या जागेवर भूमाफियांनी बेकायदा पाय पसरले असतानाही त्याविरोधात वनाधिकाऱ्यांमार्फत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.