आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:57 PM2019-05-03T21:57:18+5:302019-05-03T21:57:39+5:30

शहरातील १७ हजार लोकसंख्येला ममदापूर तलावामधून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यावर्षी परिस्थिती भीषण आहे. तलाव पूर्णत: कोरडा पडल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प पडला आहे.

Woe for 8 days | आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार

आठ दिवसांपासून पाण्यासाठी हाहाकार

Next
ठळक मुद्देममदापूर तलाव कोरडा पडल्याने पाणीटंचाई : आष्टी नगरपंचायत उपाययोजना करण्यात अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शहरातील १७ हजार लोकसंख्येला ममदापूर तलावामधून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यावर्षी परिस्थिती भीषण आहे. तलाव पूर्णत: कोरडा पडल्याने गेल्या आठ दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. मात्र नगरपंचायतीने उपाययोजना केल्या नाही. भाजपच्या नगरसेवकांनी ३ मे ला पत्रकार परिषद घेत व्यथा मांडली आहे. आठ दिवसांत पाणी द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
गतवर्षी अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे ममदापूर तलावाला कोरड पडली. गत दहा-बारा वर्षात या तलावामधील गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे पाणी साठवणीचा भाग गाळाने व्यापला होता. नैसर्र्गिक झरेही संपून पाणी आपोआपच कमी होत गेले. त्याचा परिणाम म्हणून पाणीपुरवठाच बंद झाला आहे. २ मे रोजी भाजप गटनेते नगरसेवक अशोक विजयकर, शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, विमल दारोकर, वंदना दारोकर यांनी ममदापूर तलावाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
ममदापूर तलाव पूर्णत: कोरडा पडला असून पुढील दोन महिने पाणीपुरवठा प्रभावित राहणार आहे. तलावातील गाळ आणि वातावरणातील बदलामुळे पाण्याचा बदलणारा रंग आणि पाण्यातून येणारी दुर्गंधी यामुळे अनेक वर्षे नागरिक त्रस्त होते. तलावातील गाळाचा उपसा करणे शक्य असल्यामुळे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा करून मंजुरी देण्यात आली होती. परंतु, गाळ उपसण्यापूर्वी आष्टी शहराला पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून कपिलेश्वर तलाव येथील जुनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, नादुरुस्त हातपंप दुरुस्ती नवीन बोअरवेलची व्यवस्था, शहरातील सार्वजनिक व खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, पाण्याचा स्त्रोत वाढविणे, एवढे करूनही टंचाईग्रस्त इंदिरानगर, गणेशपूर, खडकपूरा, गौरखेडा, दलित वस्ती भागात टॅँकरने पाणीपुरवठा करणे यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या उपाययोजना विरोधी पक्ष म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सुचविल्या होत्या. मात्र, याकडे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष केले. पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून सहकार्य करण्याची तयारी असताना सत्ताधारी कॉँग्रेसच्या गटाकडून कधीच विश्वासात घेतल्या गेले नाही, असाही आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे.
नगरपंचायतने उपलब्ध पाणी स्त्रोतांचा विचार सोडून २ मे रोजी थातूरमातूर उपाय म्हणून वेळेवर ममदापूर तलावाच्या काठावर दोन बोअरवेल केल्या; मात्र पाणी लागले नाही. बोअरवेलवर झालेल्या खर्चात कपिलेश्वर जुनी पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करता आला असता; मात्र तहान लागल्यावर वेळेवर विहीर खोदण्याचा प्रकार करण्यात आल्याने जनक्षोभ निर्माण होत आहे. जनआंदोलनाचा भडका उडाल्यास त्याला नगरपंचायत पूर्णपणे दोषी राहील, असा इशारा भाजप गटनेते अशोक विजयकर, भाजप शहर अध्यक्ष अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, विमल दारोकर यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

प्रस्तावाला मंजुरीच घेतली नाही
जानेवारी महिन्यापासूनच पाणीसाठा संपत होता. महाराष्टÑ शासनाच्या गाळमुक्त मोहिमेसाठी नगरपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देऊन मंजुरी का घेतली नाही? कपिलेश्वर तलावाची पाईपलाईन आजही सुस्थितीत आहे. विहीर स्वच्छ करून त्यात कपिलेश्वर तलावाच्या पाण्याने भरणा करून ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचविण्याची एवढी सरळ सोपी उपाययोजनाही नगरपंचायत करू शकत नाही. मग, एवढ्या दिवसांत सत्तेवर असून कॉँग्रेसने काय केले? असा आरोपही यावेळी पत्रकार परिषदेतून करण्यात आला.

आम्ही वारंवार या विषयावर लक्ष केंद्रित करून जुनी पाईपलाईन पुनरुज्जीवित करून गाळ उपसेपर्यंत कपिलेश्वर तलावावरून पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली होती. ७ जानेवारीला नगरपंचायतीच्या सभेत मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. आठ दिवसांत जनआंदोलन उभारणार.
- अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक, आष्टी (शहीद)

१७ हजार लोकसंख्येच्या शहरात पाणी प्रश्नाविषयी नगरपंचायतीने खेळ मांडला आहे. यापूर्वी ग्रामपंचायत असताना आमची सत्ता होती. त्यावेळी पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याचा अनुभव लक्षात घेता सत्ताधारी गटाला पाण्याच्या भीषणतेवर वारंवार सूचित करून पर्यायी उपाययोजना सुचविल्या; मात्र नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती यांनी हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही.
- अशोक विजेकर, भाजप गटनेते, नगरसेवक, नगरपंचायत आष्टी (शहीद).

२९ रोजी आचारसंहिता शिथिल झाली. २ मे रोजी जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवार अभियानामधून गाळ काढण्याच्या कामांना मान्यता प्रदान केली. एसडीओंकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करून दोन दिवसांत गाळ काढणे सुरू होईल. नवीन १८ कूपनलिका मंजूर केल्यात. त्याचेही काम सुरू करू. गावातील विहिरी स्वच्छ करून वॉर्डनिहाय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करणार आहे. ५ मे पर्यंत पाण्याचा प्रश्न प्रत्यक्षात सोडविला जाणार आहे.
- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, नगरपंचायत, आष्टी (शहीद).

Web Title: Woe for 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.