संत्रा उत्पादकांना हवी शासनाची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:45 PM2019-05-20T21:45:38+5:302019-05-20T21:46:01+5:30

जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही.

Orange growers want to be with the government | संत्रा उत्पादकांना हवी शासनाची साथ

संत्रा उत्पादकांना हवी शासनाची साथ

googlenewsNext
ठळक मुद्दे‘झेडपी’त ठराव : स्थायी समितीत झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईच्या फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. जवळपास चार हजार हेक्टरवरील संत्रा बागा सरपणाच्या वाटेवर असून बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापीटा सुरु आहे. विहिरींनी तळ गाठले, टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. परिणामी, बागा उद्धवस्त होत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सदस्यांनी केली. त्याबाबत सर्वानुमते ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
जि.प.च्या सभागृहात सोमवारी उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा पार पडली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन आेंबासे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपूल जाधव, वित्त व लेखा अधिकारी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती जयश्री गफाट, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण समिती सभापती नीता गजाम यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आर्वी, आष्टी व कारंजा हा संत्रा उत्पादकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात जवळपास ४ हजार हेक्टरवर संत्राच्या बागा आहे. यावर्षीच्या पाणी टंचाईत संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभागृहाचे एकमत होऊन ठराव घेण्यात आला. तसेच बोरगाव (टुमनी) ग्रामपंचायतील संगणक चालकाच्या उपोषणाचाही विषय सदस्यांनी सभागृहात मांडला. या ग्रामपंचायतीने उत्पन्न कमी असल्याने १४ व्या वित्त आयोगातून या संगणक चालकाचे ११ महिन्याचे वेतन देण्यास ग्रामापंचायत असमर्थ असल्याने हे गाव नजिकच्या वडाळा या गावासोबत जोडावे जेणे करुन उत्पन्न वाढेल आणि समस्याही निकाली निघेल, अशाही सूचना सदस्यांनी केल्या. त्यावरुन अधिकाºयांनी सहमती दर्शविल्याचेही सांगण्यात आले आहे. सोबतच इतरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.

अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावे
शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गावर भुयारी बोगदा तयार करण्यात आला असून दोन्ही बाजुने अ‍ॅप्रोच रोडवरुन वाहतूक सुरु आहे. अ‍ॅप्रोच रोड पुर्णत: उखरलेला असून वाहनांमुळे त्यावरील धूळ परिसरात पसरत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनाही श्वसनाचे आजार बळावले आहे. त्यामुळे या अ‍ॅप्रोच रोडचे तत्काळ डांबरीकरण करावे, यासाठी सभागृहाने ठराव घेऊन जिल्हाधिकाºयांना पाठवावा. तसेच जिल्हाधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी गटनेता संजय शिंदे यांनी केली.

वर्कआॅर्डरला मुदतवाढ द्या
अनेक विकासात्मक कामांचे वर्क आॅर्डर झाले आहे. परंतु पाण्यामुळे कामांना थांबा देण्यात आला. सोबतच वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्यानेही कामे थांबली होती. आता घाटाचा लिलाव होऊन अल्पावधीतच त्यावर स्थगिती आल्याने वाळू मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे विकासात्मक कामे ठराविक वेळात कसे पुर्ण करावे, असा प्रश्न कंत्राटदांपुढे असल्यामुळे कंत्राटदारांना वाळू ऐवजी चुरी वापरण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांच्या वर्क आॅर्डलाही मुदत वाढ द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

शासकीय बांधकाम बंद करा
जिल्ह्यातील पाणी समस्या लक्षात घेत नागरिकांनी बांधकाम बंद केले आहे. परंतु शासकीय बांधकाम अजुनही जोमात सुरु असल्याने त्यावर टँकरव्दारे पाणीपुरवठा होत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असताना दुसरीकडे शासकीय बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरु आहे. त्यामुळे शासकीय बांधकामेही बंद करावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

Web Title: Orange growers want to be with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.