रासायनिक खताची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:46 PM2018-05-31T21:46:03+5:302018-05-31T21:46:03+5:30

डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे.

Chemical fertilizers | रासायनिक खताची दरवाढ

रासायनिक खताची दरवाढ

googlenewsNext
ठळक मुद्देबॅगमागे वाढले १०० ते १२५ रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. एकीकडे रासायनिक खते निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नसल्याने किंमती वाढविण्याची सुट मिळाली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा उत्पादन खर्चावर भाव मिळत नसल्याने शेतकरी कंगाल होत आहे. याचा विचार शासनाने करण्याची मागणी होत आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणी पूर्व मशागत करण्यात व्यस्त आहे. शेतीच्या कामात बैलजोडीचा वापर कमी झाला. शेतीची बहुतेक कामे ट्रॅक्टर व तांत्रिक माध्यमातूनच होत आहे. त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे भाव सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली असताना रासायनिक खताच्या भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे खरीपासाठी बियाणे व खताचे नियोजन बिघडले आहे.
मागील खरीपात डीएपी ५० किलो बॅग १,१६० रुपयांची होती, ती आता १,२५० रुपयांची झाली आहे. तर १०.२६.२६ खत १,०५५ रुपयात मिळायचे ते आता १,१६० रुपयांत मिळत आहे. डिझेल व खताचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खर्चात मोठी वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खताच्या दरात व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गत पाच वर्षांपूर्वीच्या दराच्या तुलनेत आजच्या दरात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गत एका वर्षात खताचे दर आठ वेळा वाढल्यचे दिसून येते.
गतवर्षी रासायनिक खतांच्या किंमती दुप्पटीने वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही दुप्पट वाढ झाली; परंतु शेतमालाच्या किंमती व तुलनेत वाढल्या तर नाहीच उलट ७० टक्क्यांपर्यंत खाली आल्या. उत्पादन खर्चानुसार किंमती आकारण्याची मुभा असल्यामुळे कंपन्या मालामाल होत आहे. तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याच्या वल्गणा करण्याऱ्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांच्या मात्र उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी भावाने विकल्या जात आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे पेरणी करावी अथवा नाही या बाबात शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : गत चार ते पाच वर्षांपासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झटत आहे. शेतीत निघणारे अल्प उत्पादन व कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट वाढविण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे खताचे श्राव गोणीमागे १०० ते १२५ रुपयांनी वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन पुरते बिघडले आहे.
खरीप हंगाम जवळ आला असून यंदा हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज लवकरच वर्तविला आहे. यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची खते-बी-बियाण्याचे नियोजन सुरू केले आहे; मात्र खताच्या मोठ्या प्रमाणात दरवाढीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. मागील वर्षात खताच्या दरवाढ करण्यात आली आहे. मागील वर्षात खताच्या किंमतीत दुपटीने वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्न खर्चातही दुप्पट वाढ झाली होती. परंतु शेतमालाचे भाव ७० टक्क्यांपर्यंत खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसान सोसावे लागले.

दरवर्षी नियोजन करून खरीपाची पेरणी केली जाते. त्यात निसर्गही वेळोवेळी दगा देत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न हातात येत नाही. जे काही उत्पन्न हातात पडते. त्यालाही बाजारात मातीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतीवर खर्च अधिक व उत्पादन कमी अशी अवस्था वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांची होते. यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे.
- देविदास सातपुते, शेतकरी नेरी (मिरापूर)

Web Title: Chemical fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी