दोन दशकांची किल्लेदार परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 05:48 AM2018-11-11T05:48:14+5:302018-11-11T05:48:35+5:30

सहामाही परीक्षा संपल्या की, लागते ती दिवाळीची चाहूल आणि मग दिवाळीचे कपडेखरेदी, फराळ यांची लगबग सुरू होते. बच्चेकंपनी

Two decades of caste tradition | दोन दशकांची किल्लेदार परंपरा

दोन दशकांची किल्लेदार परंपरा

googlenewsNext

- स्नेहा पावसकर

सहामाही परीक्षा संपल्या की, लागते ती दिवाळीची चाहूल आणि मग दिवाळीचे कपडेखरेदी, फराळ यांची लगबग सुरू होते. बच्चेकंपनी मनसोक्त खेळण्याचे, नातेवाइकांकडे फिरायला जाण्याचे प्लानिंग करू लागतात. तर, कोणी किल्लाबांधणीची तयारी करतात. खरंतर, दिवाळी आणि किल्लाबांधणी ही एक परंपराच आहे. आज मोबाइलच्या दुनियेत हरवलेली मुले मैदानी खेळही फारसे खेळत नाही, तिथे किल्लाबांधणी तर दूरच. मात्र, आजही काही मंडळे, संस्था, सोसायट्यांमध्ये मातीचे किल्ले आवर्जून उभारले जातात. ठाण्यातील कोपरी येथील पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपली किल्लाभ्रमंती आणि त्याला अनुसरून दिवाळीत किल्लाउभारणीची परंपरा गेली २१ वर्षे जपली आहे. सुटीत संपूर्ण चमूसह किल्ला फिरून आले की, दिवाळीत तो उभारायचा, हे त्यांचे ठरलेलेच असते.
सन १९९८ मध्ये मंडळाच्या सदस्यांनी कुलाबा किल्ल्यावर चढाई केली होती. नंतर, सलग दोन वर्षे कर्नाळा आणि अर्नाळा किल्ले पाहिले. पण केवळ किल्ले पाहून उपयोग नाही. स्वराज्याच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांवर चढाई करून, तेथील परिसरात साफसफाई करून किल्ल्याचा अभ्यास करण्यास त्यांनी २००१ पासून खरी सुरुवात केली. २००१ सालानंतर त्यांनी शिवनेरी, शिवतीर्थ रायगड, राजगड, अफजलखानाच्या वधाचा इतिहास सांगणारा प्रतापगड, प्राचीन कोंडाणा ऊर्फ सिंहगड, कोल्हापूरचा पन्हाळा, प्रचंड असलेल्या आणि शिवरायांनी ज्याच्यावर स्वराज्याचे तोरण बांधले असा तोरणागड, विशाल अशा विशाळगडावर, त्यानंतर पावनखिंड, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, हरिश्चंद्र गड असे अनेक किल्ले, गडांची सफर केली. या किल्ल्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने किल्ल्यांची प्रतिकृती ते कोपरी परिसर पवनसुत हनुमान मंदिर परिसरात उभारतात.
दिवाळीमध्ये बाजारात या किल्ले सजावटीसाठीच्या वस्तू, तसेच तयार किल्लेही विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यातील अनेक वस्तू या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या असतात. मात्र, पर्यावरणाचे हित लक्षात घेता त्याद्वारे प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानचे सदस्य किल्ले तसेच मावळे मातीचे बांधतात. दगडमातीचे किल्ले बनवताना त्यात घोड्याची लीद अर्थात विष्ठा मिसळली की, किल्ल्याच्या तटबंदीला तडे जात नाही. त्यामुळे भक्कम किल्ला उभारावा यादृष्टीने माती कालवणे, त्यात लीद एकत्र करणे, किल्ला उभारणे, त्याला आकार आणि कलर देणे, अशी सर्व कामे प्रतिष्ठानचे सदस्यच करतात. किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या बाजूलाच त्या किल्ल्याची माहिती देणारे फलक लावले जातात. किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्यांना प्रतिष्ठानचे सदस्य माहितीही देतात.
गेल्या २० वर्षांची परंपरा असलेल्या या किल्लाउभारणी उपक्रमाला इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर मार्गदर्शन करतात. सर्वसामान्य दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक तसेच अनेक राजकीय, कला क्षेत्रातील मंडळी येथे किल्ला पाहण्यासाठी येतात. विशेष म्हणजे या सगळ्यांनी हा उपक्रम स्वेच्छेने आणि स्वखर्चातून सुरू ठेवला आहे. यासाठी कोणाकडून देणगी किंवा मदत घेतली नाही. किल्ले पाहून त्याची प्रतिकृती उभारण्याची प्रेरणा आपल्यापासून इतरांना मिळावी, हा त्यांचा हेतू आहे. राकेश वर्तक, गणेश जोशी, विशाल जोईल, संजय चोलकर, गुरुदास शेलार, अवधेश पाल, अमित जोईल, तेजस नलावडे, किरण सावंत, मयूर जोईल, शिवा नाईक हे शिलेदार दरवर्षी किल्लेचढाईत सहभागी होतात.
यंदाही सदस्यांनी दसरा झाल्यावर शिवनेरी किल्ल्यावर चढाई करून तेथे साफसफाई केली. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट्स पडलेले होते. हा सर्व कचरा प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी गोळा करून टाकला. तसेच इतरही स्वच्छता केली आणि परत आल्यावर दिवाळीत शिवनेरी गड उभारणीची तयारी सुरू केली. साडेचार फुटी उंचीचा शिवनेरी किल्ला साकारण्यासाठी यंदाही माती, दगड आणि गेरूचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्यातील सर्व बारकावे दाखवण्याचा प्रयत्न यात केला आहे.
पूर्वीच्या शिलेदारांपैकी अनेकजण आज आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त आहेत. मात्र, हाती घेतलेला किल्लाउभारणीचा वसा आपल्या कामातून वेळ काढून ते जोपासत आहे. मोबाइलमध्ये दंग असलेल्या आणि दिवाळीत फटाके फोडण्याला प्राधान्य देणाºया आजच्या पिढीनेही आपल्या या किल्लेदार उपक्रमात सहभागी व्हावे, यादृष्टीने प्रतिष्ठानचे शिलेदार प्रयत्नशील आहेत.

गडकिल्ल्यांची चढाई तर अनेक जण करतात. मात्र, नुसतीच चढाई किंवा भटकंती न करता त्या किल्ल्यावर साफसफाई करून किल्ल्याचा अभ्यास करणे आणि दिवाळीच्या सुटीत आपल्या परिसरात तो किल्ला बांधणीची किल्लेदार परंपरा जपली आहे, ती ठाण्यातील श्री पवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी. पूर्वीचे बालशिलेदार आता मोठे झालेत. मात्र, नोकरी-व्यवसाय सांभाळत रात्रीचा दिवस करत आणि विशेष म्हणजे या सर्वांनी स्वेच्छेने, स्वखर्चातून हा उपक्रम गेली २० वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवला आहे.

शिवरायांचे कर्तृत्व पुढील पिढीला माहीत व्हावे, स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची माहिती सर्वांना व्हावी आणि येथील प्रतिकृती पाहिल्यावर प्रत्येकाने या गडकिल्ल्यांना प्रत्यक्ष भेट द्यावी, या उद्देशाने आम्ही किल्ले बनवतो. किल्लासफर आणि बांधणीचा उपक्रम जास्तीतजास्त लोकांनी राबवावा, अशी इच्छा आहे, असे मत प्रतिष्ठानचे संजय चौलकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Two decades of caste tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.