मलंगगड पालखी उत्सव सोहळयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:33 PM2019-02-13T15:33:47+5:302019-02-13T15:34:31+5:30

मलंगगड (हाजी मलंगगड) पालखी उत्सव सोहळा १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होत असून सुमारे २ ते २.५० लाख भाविक या काळात दर्शनासाठी येतात हे लक्षात घेऊन याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात

should take care of Malanggad Palkhi festival | मलंगगड पालखी उत्सव सोहळयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  

मलंगगड पालखी उत्सव सोहळयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  

Next

ठाणे  - मलंगगड (हाजी मलंगगड) पालखी उत्सव सोहळा १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होत असून सुमारे २ ते २.५० लाख भाविक या काळात दर्शनासाठी येतात हे लक्षात घेऊन याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात तसेच पोलीस, स्थानिक प्रशासन, ट्रस्टी यांनी परस्पर समन्वयाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील याची पुरेपूर काळजी घेण्याची सुचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज केली. या उत्सवानिमित्त संबंधित यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली तेव्हा ते बोलत होते. आमदार गणपत गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

गर्दीवर नियंत्रणासाठी खबरदारी

आपत्कालीन प्रसंगासाठी पोलिसांनी गडाच्या पायथ्याशी तसेच वर देखील नियंत्रण कक्ष उभारण्यात यावेत तसेच मेगा फोन्सद्वारे सातत्याने गर्दीला सुचना देण्यात याव्यात. चेंगराचेंगरी सारखी दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस आणि ट्रस्टी यांनी पुरेसे स्वयंसेवक नेमून एकमेकात समन्वय ठेवावा. गडावर पाण्याचा स्वच्छ पुरवठा व्हावा याची खबरदारी कल्याण डोंबिवली पालिकेने घ्यावी तसेच गडावरील विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य असेल हे पाहावे याठिकाणी देखील कायम पोलिसांनी पहाऱ्यासाठी पोलीस तैनात करावे आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके गडाच्या पायथ्याशी तसेच मार्गावर देखील असावीत जेणे करून अवश्यकत भासल्यास लोकांना औषधोपचार करता येतील १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका पायथ्याशी तयार ठेवाव्यात तसेच परिसरातील खासगी व सरकारी रुग्णालयांना देखील प्रसंगी तयार ठेवावे, साथ रोग पसरू नयेत म्हणून सतर्क राहावे व उपाययोजना कराव्यात असे जिल्हाधिकारी म्हणाले. गडाच्या एका बाजूला संरक्षक कठडेही उभारण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले.  

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

पायथ्याशी असणारी दारूची दुकाने बंद राहतील याची खबरदारी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी घ्यावी घेण्याची सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी केली. यात्रेदरम्यान संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ४५ सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे उभारण्यात येत आहे अशी माहिती ट्रस्टीतर्फे देण्यात आली. यापूर्वी १५ सीसीटिव्ही गडावर कॅमेरे आहेत.  

खड्डे बुजवा, स्वच्छता ठेवा
नेवाळी ते चक्की नाका दरम्यानचा रस्ता खराब आहे. तसेच वाडी येथील वाहनतळ, एस टी डेपो येथील खड्डे उल्हासनगर सार्वजनिक बांधकाम विभागाने युध्द पातळीवर काम करून भरून घ्यावेत. गडावर तसेच पायथ्याशी सुद्धा पलिकेने मोबाईल प्रसाधनगृहे ठेवावीत. दर्गा परिसराची पूर्ण साफसफाई व्हावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी केली.

वीज खंडित होऊ नये

यात्रेच्या काळात भारनियमन केल्या जात नाही मात्र वीज खंडित होण्याचे प्रकार घडल्यास ट्रस्टीनी इन्व्हर्टर संच ठेवावेत. विद्युत वितरण कंपनीने फिरते पथक ठेवावे तसेच अनधिकृत जोडण्या कुणी घेणार नाही ते पाहावे. शॉर्टसर्किट्स होणार नाहीत याविषयी काळजी घ्यावी तसेच अंबरनाथ अग्निशमन दलाने देखील पुरेशी व्यवस्था व कर्मचारी तैनात करावेत अशी सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. अंबरनाथ अग्निशमन पथक पायथ्याशी आणि बदलापूर अग्निशमन दल गडावर असणार असल्याची माहिती या वेळी  देण्यात आली. हिललाईन पोलीस ठाणे, मलंग गड ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांनी दुकानदारांना  फायर एकस्टिंगविशर उपलब्ध करून द्यावेत दुकानांतील व उपाहारगृहातील खाद्यपदार्थंची पूर्व चाचणी व तपासणी अन्न व औषध प्रशासन यांनी काटेकोरपणे करावी व तसा अहवाल द्यावा असेही सांगण्यात आले.

बसेसची व्यवस्था

या उत्सवासाठी कल्याण विठ्ठलवाडी, पनवेल आगाराच्या व्यवस्थापकांनी बसेस वाढवून द्याव्यात तसेच त्याचे योग्य नियोजन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्री पुलाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी कल्याण पूर्वेला कोळसेवाडी येथून मलंगगड येथे जाण्यासाठी बसेस सोडण्याचे नियोजन करावे अशी सूचनाही त्यांनी केली.
या उत्सवासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गडाच्या पायथ्याशी व गडावर असलेल्या नियंत्रण कक्षात आपल्या उपस्थितीचा अहवाल दररोज देणे गरजेचे आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
या बैठकीस उप विभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, सरपंच संजना पाटील, एस टी महामंडळाचे सतीश वाणी,  सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता सुनील अवसरकर, अध्यक्ष व वंशपरंपरा विश्वस्त माधव केतकर, परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके, आदींची उपस्थिती होती.

Web Title: should take care of Malanggad Palkhi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण