पावसाची अन् मतांचीही जोरधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:50 AM2018-06-26T01:50:46+5:302018-06-26T01:50:50+5:30

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा सोमवारी जोर वाढला. ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरधार सरींवर सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी झाडे अन् भिंतीची पडझड झाली.

Rains and votes too | पावसाची अन् मतांचीही जोरधार

पावसाची अन् मतांचीही जोरधार

Next

ठाणे : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा सोमवारी जोर वाढला. ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरधार सरींवर सरी कोसळल्याने अनेक ठिकाणी झाडे अन् भिंतीची पडझड झाली. ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवलीतील विविध भागात पाणी साचले. मुंब्रा-कळवा-दिव्यासह भिवंडीत अनेक घरे आणि दुकानात पाणी शिरले. उल्हासनगरमध्ये भिंत कोसळून १ जण ठार तर दीर-भावजई असे दोघे जखमी झाले.
ठाणे शहरात मागील २४ तासांत (सकाळी साडेआठ वाजेपर्यंत) २२९.८१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत १०९ मिमी पाऊस पडला. यात कळवा येथील सम्राट अशोकनगर शौचास गेलेल्या विजय पवार या आठ वर्षांचा चिमुकल्याचा पाय घसरल्याने नाल्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
ठाण्यातदेखील रात्रीपासून जोरदार पावसाच्या सरी बरसल्याने शहराच्या विविध सखल भागात पाणी साचले होते. वागळे इस्टेट परिसर, महापालिका मुख्यालय मार्ग, नितीन कंपनी रस्ता, हरिनिवास, नौैपाडा, मल्हार सिनेमा परिसर, नौपाड्यातील कल्पना सोसायटी, घोडबंदर येथील डी-मार्ट परिसर या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. कळव्यातील मनिषानगर भागात अनेक चाळींमध्ये घुडगाभर पाणी साचले होते. ते बाहेर काढण्यासाठी रहिवासी एकवटले होते. या भागातील नालादेखील, दुथडी भरून वाहत होता. श्रीनगर, शांतीनगर भागातील नालेदेखील ओव्हर फ्लो झाल्याने येथील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. या भागात कचरादेखील आजही तसाच पडून असल्याचे दिसून आले. कळव्यातील हनुमान टेकडी परिसरात ५ ते सहा चाळींमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो रहिवासी हवालदिल झाले होते. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडून अपेक्षित असे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला. मुंब्य्रातही एका ठिकाणी संरक्षक भिंती पडल्याची घटना घडली. ठाण्यात पोखरण रोड येथे भिंत कोसळून दोन चारचाकी वाहनाचे आणि एक दुचाकीचे नुकसान झाले.
दातिवली, ज्ञानसाधना, कोपरी, खारेगाव, बारा बंगला, ठाणे मनोरु ग्णालय परिसर या भागात जोरदार पावसामुळे मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले.
मुंब्य्रात घरे आणि दुकानांत पाणी
मुंब्रा येथे जामा मस्जीद परिसर, कैलाश गिरी, बानू टॉवर येथे सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे भिंत कोसळली. वर्दळीच्या भागात ती कोसळल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला. वाहनांचा आणि नागरिकांचा येणाजाण्याचा मार्गच बंद झाला. अमृतनगर दर्गा रोड, शिवाजीनगर, दाडी कपांउंड, कौसा कदार, अमीना बादा, तनवर कॉम्पलेक्स या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले होते. सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहने अडकून पडली होती. तसेच अनेक ठिकाणी मुंब्य्रात घराघरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. दुसरीकडे दिव्यात काही वेगळी परिस्थिती नव्हती.

ठाण्यात दुप्पट पाऊस
ठाणे शहरात सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २२९.८१ मिमी पावसाची नोंद झाली होती. सांयकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजेच सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत १०९.०६ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ४८८ मिमी पावसाची नोंद होती. यंदा त्याच्या दुपट पाऊस झाला.

रेल्वेचा वेग मंदावला
मुंबईची लाइफलाइन मानली जाणाऱ्या लोकल सेवेवर पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले. ही सेवा संपूर्ण दिवसभर कोलमडली होती. हार्बर मार्गवर कुर्ला ते टिळकनगर स्टेशनदरम्यान रुळांवर पाणी साचले. यामुळे कुर्ला पूर्व ते लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाºया प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागली. मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होत्या.

भाजी मार्केटवर परिणाम
पावसामुळे भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचे दिसले. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाज्यांच्या विक्रीवरही झाला आहे. भाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात असली तरी पावसामुळे खरेदी-विक्रीत घट झाली आहे. भाजी मार्केटमध्ये जवळपास २० ते २५ टक्क्यांनी ग्राहकांची संख्या घटली असून, सोमवारी ७० ते ७५ टक्के ग्राहकच भाजी खरेदीसाठी आल्याचे विक्रेते भगवान तुपे यांनी लोकमतला सांगितले. भाज्यांचे दर गेल्या दोन दिवसांपासून १० टक्क्यांनी घटले आहेत.

उल्हासनगरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू
उल्हासनगर भागात मुसळधार पावसामुळे कंपाउंडची भिंत कोसळून १५ वर्षीय किरण घायवट या मुलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
नाल्यात पडून मृत्यू
भिवंडी : कारिवली येथील गोलू कुमार सिंग (अडीच वर्षे) या मुलाचा रविवारी नाल्यात पडून मृत्यू झाला. गोलू कुमार खेळत असताना नाल्यात पडला.

भिवंडीत कामवारीला पूर, सतर्कतेचा इशारा
पावसामुळे भिवंडीतील हजारो यंत्रमाग कारखान्यांची धडधड एकीकडे थांबली. तर, दुसरीकडे, तीनबत्तीनाका परिसरात असलेली भाजीमंडई जलमय झाली. मंडईलगत असलेल्या बाजारपेठेतही १०० हून अधिक दुकानांमध्ये पावासाचे पाणी शिरले. भिवंडी शहरातील नदीनाका, असलमनगर, तीनबत्ती, गैबीनगर, समृबाग, दर्गा रोडसह इतरही सखल भागातील सुमारे बहुतांश घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे पहाटेच्या सुमाराला घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. भिवंडी शहरातून वाहणाºया कामवरी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आल्याने नदीकाठी राहणाºया नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 

Web Title: Rains and votes too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.