भिवंडीत आचारसंहितेलाच ‘नोटा’
By Admin | Published: April 21, 2017 12:07 AM2017-04-21T00:07:02+5:302017-04-21T00:07:02+5:30
निवडणुकीत एखादा उमेदवार पसंत नसेल, तर यापैकी कुणीही नाही अर्थात ‘नोटा’ वापरण्याचा अधिकार मतदारांना असतो
भिवंडी : निवडणुकीत एखादा उमेदवार पसंत नसेल, तर यापैकी कुणीही नाही अर्थात ‘नोटा’ वापरण्याचा अधिकार मतदारांना असतो. तसाच ‘नोटा’ म्हणजे नकाराधिकार भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वापरायचा ठरवल्याप्रमाणे भिवंडीतील वातावरण असून निवडणुकीचे आदेश जारी होऊनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत कामालीची उदासीनता असल्याचे दिसून आले. शहरभर सर्वत्र राजकीय पक्षांचे बॅनर, फलक , पोस्टर, झेंडे कायम आहेत. एवढेच नव्हे, तर सरकारी वाहनांवरील, इतर गाड्यांवरील राजकीय पक्षांची चिन्हे, झेंडेही डौलाने फडकत आहेत.
पालिकेच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक कार्यालयाने अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. पण त्यानुसार काम सुरूच झालेले नाही. राजकीय पक्षांपेक्षा अधिकाऱ्यांनाच निवडणूक लांबणीवर जाते की काय अशी उत्सुकता असल्यासारखे कामात शैथिल्य आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही विनापरवाना राजकीय पक्षांचे फलक झळकत आहेत. अनेक नगरसेवकांनी आपल्या गाड्यांवरील पालिकेचे मानचिन्ह काढलेले नाही. काहींनी गाडीवरील राजकीय पक्षाचे चिन्ह, झेंडे कायम ठेवले आहेत. प्रभाग कार्यालयाच्या आजूबाजूस राजकीय पक्षाचे बॅनर आहेत. आचारसंहिता लागू होताच कशापद्धतीने कामे करायची याचे नियोजन नसल्याने आचारसंहितेचे बिनदिक्कत उल्लंघन होत आहे. निवडणूक कार्यालयांतून आतापर्यंत ६० मतदारयाद्या विकल्या गेल्या आहेत. परंतु सारे काम पालिकेच्या मुख्य कार्यालयांतून सुरू असल्याने अधिकारी शोधूनही सापडत नाहीत. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुड्डू हुकूमशहा : महापालिका निवडणूक जाहीर होताच पक्षातील वादांनाही तोंड फुटायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष खालीद गुड्डू यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असून ते हुकूमशहाप्रमाणे पक्षाचे निर्णय घेत असल्याचा आरोप शहर कार्यकारिणीतील खजिनदार सिद्राम श्रीगिरी यांनी औपचारिक चर्चेत केला. जुन्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम किंवा बैठकीस न बोलविता परस्पर निर्णय घेतात. मुख्य कार्यकारिणीची बैठक होत नाही. पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता परस्पर नेमणूका केल्या जातात. याचा जाब वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी न विचारल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे श्रीगिरी यांनी सांगितले. या बाबत शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी होऊ शकला नाही.
मनसेची तयारी सुरू : निवडणूक जाहीर होताच मनसेने पदाधिकारी आणि उमेदवारांची बैठक घेऊन जेथे पक्षाची ताकद आहे, तेथील लढतीबाबत चर्चा केली. पक्षाने दोन महिने अगोदरपासून तयारी सुरू केली होती. त्या रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मदन पाटील यांनी सांगितले.
सेनेची मदार याचिकेवर : मतदारयाद्यांतील दुबार नावांबरून उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख संजय काबूकर हेही एक याचिकाकर्ते आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरच हालचालींना वेग येईल अशी माहिती शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी दिली.