डोंबिवलीकरांपुढे इकडे आड, तिकडे विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:39 AM2019-07-22T00:39:03+5:302019-07-22T00:42:18+5:30

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने नव्याने उड्डाणपूल बांधला.

Around the Dombivlikar | डोंबिवलीकरांपुढे इकडे आड, तिकडे विहीर

डोंबिवलीकरांपुढे इकडे आड, तिकडे विहीर

Next

प्रशांत माने, डोंबिवली

भविष्यात डोंबिवली शहर वाढणार आहे, हे लक्षात घेऊन तत्पूर्वीच संबंधितांनी त्याबाबतचे नियोजन करणे आवश्यक असते. परंतु, नियोजनाअभावी एखाद्या शहराची कशी वाताहत होते, सर्वसामान्यांना कसा फटका बसतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्या कोपर उड्डाणपुलावरून येजा करणाऱ्या वाहतुकीला पडलेल्या मर्यादा आणि ठाकुर्ली उड्डाणपुलावर उद्भवणारी वाहतूककोंडी हे आहे. याला रेल्वे आणि केडीएमसी प्रशासनामधील समन्वयाचा अभाव जसा कारणीभूत आहे, त्याचबरोबर पुरेशा मनुष्यबळाअभावी वाहतूक पोलिसांसमोरील ‘इक डे आड, तिकडे विहीर’ ही परिस्थितीही कारणीभूत आहे. यामध्ये वाहतूककोंडीचा प्रश्न जैसे थे राहत असल्याने वाहनचालकांचीही परवड होत असून याचा फटका पादचाऱ्यांना बसत आहे.

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने नव्याने उड्डाणपूल बांधला. परंतु, पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथील वाहतूक पूर्णत: कोलमडल्याचे चित्र सकाळ-संध्याकाळ दिसते. या पुलालगतच्या परिसरातील बहुसंख्य इमारती या जुन्या आहेत, त्यामुळे त्यांना स्वत:ची पार्किंगव्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्क करावी लागतात. या भागात शाळा-महाविद्यालये असल्याने येथून मार्गस्थ होणाºया अवजड वाहनांना बंदी घालावी, असे पत्र शाळा प्रशासनाकडून वाहतूक विभागाला देण्यात आले होते. याउपरही अवजड वाहनांची येजा सुरूच होती. पण, आता कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने ठाकुर्ली उड्डाणपुलावरील वाहतूक सुरूच राहणार आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार हा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो वाहतुकीसाठी तत्काळ बंद करावा व त्याची डागडुजी करावी, असा सल्ला दिला. मध्य रेल्वेने २० मे रोजी केडीएमसीला पत्र देऊन पूल वाहतुकीस बंद करावा, असेही सुचवले. महत्त्वाची बाब म्हणजे याबाबतची कोणतीही माहिती वाहतूक विभागाला नव्हती. यातून यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कसा असतो, याचे दर्शन घडले. दरम्यान, वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीनंतर सद्य:स्थितीत या पुलावरून अवजड वाहनांना येजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १२ टनांवरील वाहनांचा यात समावेश आहे. शाळा, केडीएमटी, एनएमएमटीच्या बसेसना पुलाचा वापर करण्यास परवानगी आहे. पण, वाळूचे ट्रक, डम्पर, सिमेंट, मालवाहू वाहनांना मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, पालकांच्या मागणीनुसार शाळा व्यवस्थापनाने पुलावरून वाहतूक करण्यास नकार दिल्याने सद्य:स्थितीला त्या बसची वाहतूक पूर्णपणे ठाकुर्ली उड्डाणपुलावरून होत आहे. वाळूचे ट्रक, डम्पर, सिमेंट, मालवाहू वाहनेदेखील ठाकुर्लीतून मार्गस्थ होत आहेत. ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याकरिता प्रस्तावित केलेल्या अधिसूचनेत या पुलावरून जडअवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. परंतु, कोपर पूल धोकादायक ठरल्याने नाइलाजास्तव ठाकुर्ली पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक करणे अपरिहार्य ठरले आहे. प्रस्तावित अधिसूचना पाहता ठाकुर्ली परिसरातील वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी काही मार्ग हे एकदिशा करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी ‘पी १’ आणि ‘पी २’ असे बदल सुचवले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

उड्डाणपुलाच्या परिसरातील नियोजनासह कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात मोठ्या प्रमाणावर होत असलेले पार्किंग पाहता तेथील वाहतुकीतही बदल सुचवण्यात आले आहेत. दोनतीन महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत त्याला मान्यता मिळालेली नाही. कोपर उड्डाणपुलासंदर्भातील वाहतूकबदलाची अधिसूचना ही तातडीची बाब म्हणून तत्काळ कार्यवाही झाली. पण, ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाढलेला वाहतुकीचा ताण पाहता त्याचीही लवकरात लवकर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

ठाकुर्ली उड्डाणपुलाला लागून असलेल्या पंचायत बावडी ते म्हसोबा चौक यादरम्यान सदैव निर्माण होत असलेले कोंडीचे चित्र पाहता रेल्वे प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी त्यांच्या अखत्यारीतील आवश्यक जागा द्यावी, असे पत्र कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांना पाठवले होते. रेल्वेच्या जागेतील संरक्षक भिंत पडली होती. ती बांधण्याचे काम सुरू आहे. अरुंद रस्त्यालगत असलेली भिंत बांधणीच्या वेळेस थोडी आत घेतल्यास रस्ता रुंद होऊन त्यावरून दोन्ही बाजूंकडील वाहने मार्गस्थ होणे सोयीचे होईल, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले होते.

परंतु, रेल्वे प्रशासनाने त्यांच्यातील आडमुठेपणा कायम ठेवत जागा दिलीच नाही. संरक्षक भिंत बांधण्याचे काम जोमाने सुरू आहे. दरम्यान, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील अंतर्गत रस्त्यांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांच्याकडून गेले काही दिवस सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता. उपोषणाच्या इशाºयानंतर केडीएमसी प्रशासनाने रस्त्यातील वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची कार्यवाही केली. परंतु, अद्यापही तेथील ट्रान्सफॉर्मर महावितरण विभागाकडून स्थलांतरित करण्यात आलेले नाहीत. परिणामी, कोंडीची परिस्थिती जैसे थे राहिली आहे.

चौधरी असो अथवा हळबे या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना कोंडीची दखल घेतली गेल्याचे पाहायला मिळाले खरे, पण याच कोंडीतून मार्गस्थ होणारे महापालिकेचे अन्य पदाधिकारी आणि अधिकारी वाहतूकव्यवस्था सुरळीत होण्याकरिता कधी पुढाकार घेणार, हा सवाल आहे. केडीएमसी, रेल्वे आणि त्याचबरोबर महावितरण विभागाला कोंडीचे कितपत गांभीर्य आहे? त्यांच्या कृतीतून समन्वय आणि नियोजनाचा अभाव दिसत आहे आणि वाहतूक पोलिसांचे हाल तर वाहनचालकांची परवड कायम राहिली आहे.

Web Title: Around the Dombivlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.