बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:22 AM2019-04-21T02:22:20+5:302019-04-21T02:22:24+5:30

प्रश्न पाणीवितरणाचा; आठवड्यातून दोनदा १५ तासांची केली जाणार कपात

'Ambernath Pattern' to be implemented in Badlapur | बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

Next

अंबरनाथ: पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३० तासांची पाणीकपात लागू केली होती. ही कपात सरसकट केली जात असल्याने त्याचा परिणाम हा दोन ते तीन दिवस राहतो. सलग दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता बदलापूरमध्येही प्राधिकरणाने अंबरनाथ पॅटर्न राबवण्याचे काम हाती घेतले आहे. सलग ३० तास पाणीकपात न घेता आठवड्यातून दोन वेळा १५-१५ तासांची कपात केली जाणार आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सक्रिय झाल्याने याप्रकरणी संताप व्यक्त होत होता. शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरण पाणी पोहोचवू शकत नसल्याने या भागात टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातही टँकरमालक वाढीव दर आकारत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो. शहरातील पाणीसमस्या वाढत असल्याने प्राधिकरणाने नवीन प्रयोग हाती घेतला आहे. सलग ३० तास पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या आणि तिसºया दिवशीही पाणीवितरणात अडचणी येतात. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी प्राधिकरणाने शहराचे चार विभाग करून प्रत्येक विभागानुसार आठवड्यातून दोन वेळा १५ तासांची पाणीकपात घेतली जाणार आहे. पाणीसमस्येवर तोडगा काढत असताना १५ तासांची कपात घेतल्याने वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत होणार आहे. ३० तासांच्या कपातीमुळे सर्व जलवाहिन्या या कोरड्या पडत असल्याने वितरण सुरू झाल्यावर कोरड्या पडलेल्या वाहिन्या भरण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे जलवाहिन्या कोरड्या पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे सातत्याने प्राधिकरणाच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे निघत होते.

अतिरिक्त पाण्यासाठी पाठपुरावा सुरू
शहरासाठी जे ३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे, ते लवकरात लवकर नागरिकांना मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता मनीषा पालंडे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या अतिरिक्त पाण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे वाढीव पाणी बारवी धरणावर अवलंबून असल्याने या धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. मात्र बारवी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नसून जून महिन्यापर्यंत त्यांचा प्रश्न सोडविण्यात यश आले तरच बदलापूरकरांची तहान भागणार आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ शहराची असून बारवीच्या पाण्यावर २० दशलक्ष लिटर आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता ५० दशलक्ष पाण्यासाठी प्राधिकरणाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी टॅँकरवर अवलंबून असलेल्या परिसरात प्राधिकरणाने लक्ष देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार, प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पालिका ज्या पद्धतीने प्रत्येक टँकरमागे ६०० आणि ८०० रुपये आकारत आहे, तशाच पद्धतीने प्राधिकरणाने खाजगी टँकरचालकांनाही दर निश्चित करून त्या दराने पाणी देण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यावरही प्राधिकरणाचे अधिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: 'Ambernath Pattern' to be implemented in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.