अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 03:43 AM2017-10-22T03:43:42+5:302017-10-22T03:46:28+5:30

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

2301 'Black Spots' of Accident, Dangerous Space to Be Found on Mobile Screen | अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा

अपघातांचे २३०१ ‘ब्लॅक स्पॉटस’, मोबाइल स्क्रीनवर कळणार धोकादायक जागा

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणा-या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग, माळशेज घाट आणि पालघर, जव्हार परिसरातील रस्त्यांवरील अपघाती व अतिधोकादायक दोन हजार ३०१ ठिकाणांची नोंद ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट्स’ म्हणून झाली आहे. या ठिकाणांचे आता लवकरच जिओ टॅगिंग होणार आहे. यामुळे संबंधीत रस्त्यावरून धावणा-या वाहनातील स्क्रीन व मोबाइलवरही ‘अपघात स्थळ’ जवळ आल्याचे वाहनचालकास सूचित केले जाणार आहे.
रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रस्त्यांवरील ठिकठिकाणचे ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ म्हणजे अतिधोकादायक अपघात ठिकाणं शोधण्याचे आदेश जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी महापालिकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आदी यंत्रणांना दिले आहेत. आतापर्यंत दोन हजार ३०१ अपघाती व धोकादायक ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट्स’ निश्चित करण्यासाठी तयार केलेल्या निकषांनुसार, कोणत्याही रस्त्यावरील ५०० मीटरच्या भागात गेल्या तीन वर्षांत किमान पाच अपघात झाले असल्यास त्या ठिकाणाचा ‘ब्लॅक स्पॉटस’ मध्ये समावेश केला जाणार आहे. ज्या अपघातांमध्ये किमान दहा व्यक्ती मृत अथवा गंभीर जखमी असतील असे अपघात ज्या ठिकाणी झाले आहेत त्यांना ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले जाणार आहे. या ‘ब्लॅक स्पॉट’ अपघात ठिकाणांचे जिओ टॅगिंग करून दरवर्षी सुमारे १० टक्के अपघातांमध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
असे एक ना अनेक अपघात माळशेज घाटात या आधी झाल्याची नोंद आहे. भविष्यात या घाटातील सर्व अपघाती व धोकादायक ठिकाणांचे जिओ टॅगिंग केल्यावर मृत्यूचा सापळा अशी ओळख असलेल्या हा घाट सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आहे. वाहनातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या अपघाती व धोकादायक ठिकाणांची पूर्वसूचना या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना दिली जाणार आहे.
सर्वाजनिक बांधकाम विभाग १ चे बहुतांश क्षेत्र महापालिका कार्यक्षेत्रात येते. या विभागासह बांधकाम विभाग २ च्या १६८ किलोमीटरच्या जिल्हा मुख्य महामार्ग (एमडीआर) कार्यक्षेत्रात कोठेही अपघाती व धोकादायक ‘ ब्लॅक लिस्टेड स्पॉट ’ नसल्याचे अहवालावरून उघड झाले आहे. या अशा अपघाती रस्त्यांचा शोध घेऊन त्यांची नोंद करण्याची साधी कल्पनादेखील ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून जि.प.च्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची देखभाल करणाºया या बांधकाम विभागाला ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ आढळून आले नसले तरी पालघर व जव्हार येथील बांधकाम विभागाने मात्र ७१ अपघाती ठिकाणे जिओ टॅगिंगसाठी शोधली आहेत.
या अपघात स्थळांपैकी पालघर विभागाने ८६४ ठिकाणांची कायमस्वरूपी अपघात स्थळे म्हणून तर ५७ ठिकाणांची तात्पुरत्या स्वरूपाची अपघात स्थळे म्हणून नोंद केली आहे. पालघरमध्ये गेल्या तीन वर्षात ५४१ अपघातात ५३ जण जीवास मुकले, तर ४१९ गंभीर आणि ५७ किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे.
याचप्रमाणे १०० ठिकाणेही कायमस्वरूपी अपघाताची ठिकाणे तर ५० तात्पुरत्या स्वरूपाच्या अपघातांची ठिकाणे असल्याची नोंद जव्हार विभागाने केली आहे. या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये गेल्या तीन वर्षात ७२ जणांचा मृत्यू झाला, तर ४३३ जण गंभीर जखमी झाले आणि ९२ जण किरकोळ जखमी झाले. ठाणे व पालघर जिल्ह्यातील अपघातांवर मात करण्यासाठी जिओ टॅगिंग तातडीने करण्याची मागणी आहे.


ठाणे, पालघर जिल्ह्यातील क्षेत्रांचा समावेश
मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागांना जोडणारे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आहेत. त्याचप्रमाणे राज्य व जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची निवड प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे. या अपघाती व धोकादायक याठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरु स्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगवणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा आॅडिट आदी कामे सातत्याने करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
माळशेज घाटातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी एक हजार २३० ‘ब्लॅक लिस्टेड स्पॉट’ शोधण्यात आले, असे मुख्य कार्यकारी अभियंत्या तृप्ती नाग यांनी सांगितले. नागमोडी वळणाच्या माळशेज घाटात मागील वर्षी ट्रक दरीत पडल्याच्या दुर्दैवी घटनेसह बसचा अपघात होऊन प्रवाशाना जीव गमवावा लागला आहे. टेम्पोवर दरड कोसळून अपघात झाले आहेत.

Web Title: 2301 'Black Spots' of Accident, Dangerous Space to Be Found on Mobile Screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे