दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:20 AM2018-12-21T05:20:21+5:302018-12-21T05:20:40+5:30

कारण अस्पष्ट : आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने केली चौकशीची मागणी

18 crores of rice worth two crores disappeared | दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

दोन कोटींचा १८ हजार क्विंटल भात गायब

Next

रवींद्र सोनावळे

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्णांतील शेतकºयांकडून २००९-१० ते २०१६-१७ या आठ वर्षांत खरेदी केलेला आठ कोटी ७१ लाख ५० हजारांचा ५६ हजार क्विंटल भात ११८ गोदामांत ठेवला होता. यातील तीन कोटी ७२ लाखांच्या २४ हजार क्विंटल भाताची भरडाई करून लिलावाद्वारे विक्री झाल्यानंतर ३२ हजार क्विंटल भात शिल्लक असणे अभिप्रेत होते. प्रत्यक्षात १४ हजार क्विंटलच भात आढळून आला आहे. (भरडाईनंतर यातील १० हजार क्विंटल भाताची लिलावाद्वारे शासनाने विक्री केली असून, चार हजार क्विंटल भात कानविंदे येथील मध्यवर्ती गोदामात ठेवण्यात आला आहे.) यात दोन कोटी ७९ हजार रुपये किमतीच्या १८ हजार क्विंटल भाताची घट आढळली आहे. उंदीर, घुशींचा प्रादुर्भाव किंवा ऊन-वारा-पावसामुळे भात सडला की तो चोरीस गेला, याची चौकशी करण्याची मागणी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी जव्हार येथील प्रादेशिक व्यवस्थापन कार्यालयाकडे केली आहे.

आधारभूत भातखरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भातखरेदीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली असून ३१ मार्चपर्यंत शेतकºयांकडून भातखरेदी करण्यात येणार आहे. एक हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल दराने ही भातखरेदी करण्यात येत असून, भात ठेवण्यासाठी तालुक्यातील शहापूर, किन्हवली, अघई, डोळखांब, खर्डी, अंबर्जे, टेंभा-मढ येथील सात गोदामे दोन रुपये ४० पैसे प्रतिक्विंटल प्रतिमहिना दराने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. प्रतिबारदाना शेतकºयांना २० रुपये देण्यात येत आहेत. यावर्षी महिनाभरात चार कोटी ६० लाखांचा २६ हजार ७०० क्विंटल भातखरेदी करण्यात आल्याचे एडगे यांनी सांगितले.

किन्हवलीत शेतकºयांचा भात असुरक्षित
किन्हवली भातखरेदी केंद्रांतर्गत बेडिसगाव येथील भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये भातखरेदी करण्यात येत असून खरेदी केंद्रप्रमुख गुलाब सदिगर येथे उशिरा येत असल्याने शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला भात खरेदीअभावी रात्री गोदामाबाहेर ठेवावा लागतो. येथे सुरक्षारक्षक नसल्याने भाताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न शेतकºयांना भेडसावतो आहे.

कर्मचाºयांचा अभाव
कर्मचारी संख्या कमी असल्याने केंद्रप्रमुखावरच भातखरेदी करणे आणि त्याची सुरक्षा करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. कार्यालयात ४६ कर्मचाºयांची मंजुरी असताना अवघे सहाच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातीलही एका कर्मचाºयाने निवृत्ती घेतली असून एक कर्मचारी दीर्घकालीन रजेवर आहे. परिणामी, सध्या चारच कर्मचारी कार्यरत असून निवृत्त कर्मचाºयाला तीन महिन्यांसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने कामात विलंब होत असल्याची खंत एडगे व्यक्त करतात.

डोळखांबमध्ये भातखरेदी रखडली

भातखरेदी केंद्रप्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे डोळखांब भातखरेदी केंद्रांतर्गत भातखरेदीचे काम रखडले आहे. ती लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोर्चा काढणार असल्याचे समजते.

गेल्या वर्षी एक हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेल्या सहा कोटी २० लाखांच्या ४० हजार क्विंटल भाताची भरडाई करून शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. - विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ

Web Title: 18 crores of rice worth two crores disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे