कमी गुण मिळालेत.. घाबरू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:38 PM2019-05-29T12:38:39+5:302019-05-29T12:39:24+5:30

विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळालेत घाबरू नका... गुणांवरून गुणवत्ता ठरविण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती ...

Get fewer points .. Do not be afraid! | कमी गुण मिळालेत.. घाबरू नका !

कमी गुण मिळालेत.. घाबरू नका !

Next

विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळालेत घाबरू नका... गुणांवरून गुणवत्ता ठरविण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते तर गुणवत्ता यादीत आले असते का? न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? शून्यातून विश्व निर्माण करणाºया या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा आम्हांस माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रिकातील गुणांचाच आग्रह का, कशासाठी आपण धरत आहोत. यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल, तर मग समाजातील बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नव्हते, ते जगायला अपात्र ठरली आहेत का... तर नाही.

आजचे युग हे जीवघेण्या स्पर्धेचे आहे. अगदी जन्माला आल्यापासून ही स्पर्धा चालू होते, हा ताण कधी कधी शालेय विद्यार्थ्यांना एवढा असह्य होतो की, या त्रासापासून मुक्त होण्यासाठी ते आपले जीवन संपवून टाकतात. याची सुरुवात अगदी आपल्या घरापासून होते. कारण प्रत्येक पालकाला आपला पाल्य सर्वात पुढे राहिला पाहिजे, असे वाटत असते. समाजात वावरत असताना मुलांच्या गुणांची चिंता कोणाला अधिक आहे हे समजेल. एखादा शेतकरी, मजूर आई-वडिलांनी असा आग्रह धरलेला मला तर कधीच दिसला नाही. पण बहुदा शिकून स्थिर झालेले सुशिक्षित म्हणून घेणारे पालक गुणांसाठी आग्रही असतात.

दहावी, बारावी परीक्षेत जर गुण किंवा ग्रेड कमी आले तर विद्यार्थी हताश होतात. सर्व काही संपले, या आविर्भावात राहतात. वर्षभर मेहनत करूनही आपल्याला कमी गुण का पडले, याचाच विचार ही मंडळी करतात. अपेक्षेपेक्षा मार्क कमी पडल्याने भविष्यकाळ अंधार वाटू लागतो. आपले काही खरे नाही, असा विचार मनामध्ये बळावतो. आज आमची सगळी व्यवस्था निकालाभोवती फिरताना दिसते. पण खरे गुणवान व गुणवत्ताधारक या व्यवस्थेतही टिकून राहतात.  गुण महत्त्वाचेच, पण गुणवत्ता त्याहूनही अधिक मोलाची आहे. गुणवत्तेशिवाय गुणांचे खरे मोल कळत नाही.

गुण कमी पडले तर हताश किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी अशा बॅडपॅचला सामोरे जावे लागते. त्यामुळे काळजी करू नका, चुकांमधून पुन्हा शिकण्याचा प्रयत्न करा. गुण कोणत्या कारणामुळे कमी पडले याचे अवलोकन करा. आपल्याला गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणखी काय करावे लागेल, यासाठी पालक, मित्र आणि शिक्षकांशी सल्लामसलत, चर्चा करा. त्यांच्यापासून दूर राहण्याते नुकसान आपलेच असते. नेहमी सकारात्मक विचार करा. स्पर्धात्मक युगात गुणांना नक्कीच महत्त्व आहे, परंतु त्यापेक्षाही आपले जीवन मौल्यवान आहे. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी मुलांकडून घडतीलही. अपयश पदरी येईल, पण अपयश हा काही प्रयासांचा शेवट नाही. फारफारतर अपयश हा यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, तो रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. प्रत्येकाकडे त्याच्या क्षमता असतात. त्याला त्या शोधू द्या. 

निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे फुलवतात. कोणी उंच उडी, कोणी लांब उडी मारून उच्चांक करतो. यश मिळवू शकतो. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की, यशाचे मार्ग निर्माण करता येतात... त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गुण कमी मिळाले म्हणून घाबरून जाऊ नका. त्यातूनही तुमचे काही चांगले होणार असेलच.....
- प्रा. तात्यासाहेब काटकर 
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Web Title: Get fewer points .. Do not be afraid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.