झाडे जगविल्यास घरपट्टी भरणार सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:14 PM2019-07-14T23:14:32+5:302019-07-14T23:14:37+5:30
मसूर : कºहाड तालुक्यात दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाडळी-हेळगाव येथील सरपंच सुरेखा जाधव यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ...
मसूर : कºहाड तालुक्यात दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या पाडळी-हेळगाव येथील सरपंच सुरेखा जाधव यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये त्यांनी जे ग्रामस्थ पाडळी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्याकडेला पाच झाडे लावून त्याची वर्षभर जोपासना करतील, त्या ग्रामस्थांची वर्षभराची घरपट्टी सरपंच सुरेखा जाधव स्वत: भरणार आहेत. ग्रामस्थांनी ही झाडे २० जुलैपर्यंत लावावीत, असेही आवाहन सरपंच जाधव यांनी केले आहे.
पाऊसमान कमी झालेल्या पाडळी गावचे नंदनवन करण्यासाठी सरपंच सुरेखा जाधव यांनी उचललेले पाऊल महाराष्ट्राला दिशादर्शक ठरू शकते. कºहाड उत्तर मतदार संघातील शेवटचे टोक असलेले पाडळी गाव सुमारे पाच हजार लोकसंख्येचे आहे. या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरश: टाहो फोडावा लागतो. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावाची पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढवताना त्यांनी गावच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली होती. या निवडणुकीतील आश्वासनाला स्मरून नुकताच त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला त्यांनी ‘ग्रामपंचायत पाडळी वृक्षमित्र योजना’ असे नाव दिले आहे.
ग्रामस्थांना फक्त पाच झाडे लावून ती जगवावी लागणार आहेत. त्याच्या मोबदल्यात सरपंच सुरेखा जाधव संबंधित ग्रामस्थाची पूर्ण वर्षाची घरपट्टी स्वत: भरणार आहे. तसेच सर्व प्रकारचे दाखले विनामूल्य देणार आहेत. झाडांची आणि वर्षभर संगोपन केल्याची नोंद स्वत: सरपंच आणि ग्रामपंचायत घेणार आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र वृक्षलागवडीचे उपक्रम सुरू आहेत. वृक्षलागवडीचा फार्स न करता जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन होणे गरजेचे असते. या प्रक्रियेमध्ये लोकसहभाग असल्याशिवाय हे कार्य शक्य नाही. ही बाब ध्यानात घेऊन कºहाड तालुक्यातील पाडळी गावच्या सरपंच सुरेखा जाधव यांनी हा आगळावेगळा संकल्प हाती घेतला आहे.
वृक्षारोपण व त्याच्या संगोपनाची भावना ग्रामस्थांमध्ये वृद्धिंगत व्हावी, या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी होऊन वृक्ष लागवडीचा आदर्श घालून द्यावा आणि हरितक्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
- सुरेखा जाधव, सरपंच, ग्रामपंचायत पाडळी