कास परिसरात भलरी गीतांचा निनाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 08:25 PM2017-07-29T20:25:45+5:302017-07-29T20:27:01+5:30

kaasa-paraisaraata-bhalarai-gaitaancaa-nainaada | कास परिसरात भलरी गीतांचा निनाद!

कास परिसरात भलरी गीतांचा निनाद!

googlenewsNext
ठळक मुद्देपारंपरिक भात लागण मुसळधार पावसात डोईवर इरले बळीराजाचे कुटुंब शेतात




पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाºया कास बामणोली परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने भात लावणीस वेगाने सुरुवात झाली आहे.
या परिसरातील  शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. भाताच्या शिवारात ‘रामा हो रामा..’रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी झिरमिरी .. माझ्या बंधूंच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं ... मारूतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते ... कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईचे डोंगरी गजबारल्या तोरणी ..., ' अशा कित्येक पांरपरिक भलरी गीतांचे स्वर निनादू लागले आहेत.
कास बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल माती व मुरबाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी लाल माती व मुरबाड असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर, अशा झाडांची कवळे बांधतात. होळी या सणानंतर तरव्यांची भाजणी केली  जाते. पावसाळ्याला  सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यामध्ये भाताच्या बियाणांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पध्दतीने औताच्या साहायाने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तर भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.
 डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने एकमेकांना  मदत करत आहेत. त्यामुळे  भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत असल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.

चौकट : पैरा : परस्परांना मदत करण्याची प्रथा
    वस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच या परिसरात पैरा म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठया प्रमाणावर मागणी होत आहे.
कोट:
परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबुन आहे. काही तुरळक ठिकाणी अजूनही ओढे अथवा विहिरीतील पाणी साठवुन भात लावणी होत आहे. भात लावणी करताना आजही ही प्रर परिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवुन आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.
      बाबुराव भोसले /शेतकरी

Web Title: kaasa-paraisaraata-bhalarai-gaitaancaa-nainaada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.